भारताला 2047 पर्यंत…; अयोध्येत धर्मध्वज फडकवताच पंतप्रधान मोदींनी सांगितले त्यांचे स्वप्न
अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऐतिहासिक धर्मध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्यात मोदींनी २०२४७ पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचा संकल्प मांडला.

आज अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचे ऐतिहासिक आणि भव्य आरोहण करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर हा धर्मध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मोठ्या संख्येने साधू-संत उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या एका अभूतपूर्व स्वप्नाबद्दल भाष्य केले आहे.
गेल्या ११ वर्षात महिला, दलित, मागास अति मागास, वंचित आदिवासी, श्रमिक आणि युवा प्रत्येक वर्गाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं. देशातील प्रत्येक व्यक्ती आणि वर्ग सशक्त झाला तरच संकल्पाच्या सिद्धीला सर्वांचे हातभार लागेल. २०४७ मध्ये देश स्वातंत्र्याचा जल्लोष करेल. १०० वा स्वातंत्र्य दिन साजरा करेल. तोपर्यंत आपल्याला विकसित भारत व्हायचं आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आपल्यातील राम जागृत केला पाहिजे
येत्या १००० हजार वर्षासाठी आपल्याला भारताचा पाया मजबूत करायचं आहे. आपल्याला वर्तमानासह भावी पिढ्यांबाबत विचार करायचा आहे. आपण नव्हतो तेव्हाही देश होता. आपण नसणार तेव्हाही देश राहिल. आपण जिवंत समाज आहोत. आपल्याला दूरदृष्टीने काम करायचं आहे. आपल्याला येणारे शतक, दशक लक्षात ठेवावे लागेल. त्यासाठी आपल्याला रामाचं व्यक्तित्व समजलं पाहिजे. त्यांचा व्यवहार समजला पाहिजे. राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे मर्यादा, राम म्हणजे सर्वोच्च चरित्र, सत्य आणि पराक्रमाचा संगम हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. राम म्हणजे जनतेचं सुख सर्वोच्च ठेवणं. राम म्हणजे धर्म आणि दया. राम म्हणजे ज्ञान आणि विवेकाची पराकाष्ठा, राम म्हणजे कोमलतेत दृढता. राम म्हणजे कृतज्ञतेचं सर्वोच्च उदाहरण. राम म्हणजे श्रेष्ठ संगतीची निवड. राम म्हणजे विनम्रतेत महाबल. राम म्हणजे सत्याचा संकल्प. राम म्हणजे जागरुक आणि शिस्तबद्धता, निष्कपट मन. राम केवळ फक्त एक व्यक्ती नाही. मूल्य आहे. मर्यादा आहे. दिशा आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित करायचं असेल. समाजाला सामर्थ्यवान बनवायचा असेल तर आपल्यातील राम जागृत केला पाहिजे, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तेव्हाच आपला देश प्रगतिशील होईल
हा संकल्प करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. हा दिवस सोनेरी दिवस आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजावर असे प्रतिक होते की ज्याचा आपल्या शक्तीसोबत, वारसासोबत काहीच संबंध नव्हता. आम्ही हे प्रतिक हटवले. आपण शिवाजी महाराजांशी संबंधित प्रतिक घेतले. केवळ डिझाईनमध्ये बदल केला नाही तर मानसिकता बदलण्याचं हे काम होतं. हेच परिवर्तन आज अयोध्येतही दिसत आहे. ज्यांनी रामत्व नाकारलं ही गुलामीची मानसिकता आहे. भारत वर्षाच्या प्रत्येक कणाकणात राम आहे. पण गुलामीच्या मानसिकतेने प्रभू रामालाही काल्पनिक म्हटलं गेलं. आपण ठरवलं तर येत्या १० वर्षात आपण मानसिक गुलामीतून मुक्ती मिळवू शकू. तेव्हा २०४७ पर्यंत भारताला विकसित भारत करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. मॅकालेच्या गुलामीच्या प्रोजेक्टला हटवू तेव्हाच आपला देश प्रगतिशील होईल, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले.
