CJP Protest : हे सरकार तर तरुणांच्या विरोधात, पेपर लीक करणारे मोकाट; CJP च्या आंदोलनावर राहुल गांधींची प्रतिक्रिया!
राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

Rahul Gandhi On CJP Protest : राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात देशभरातून हजारो तरूण सहभागी झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टीतर्फे आज (20 जुलै) ‘संसद मार्च’ची हाक देण्यात आली होती. याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारो आंदोलकांनी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गर्दी केली. तसेच काहीही झालं तरी आम्ही संसदेपर्यंत जाऊन आंदोलन करणार, अशी भूमिका घेतली. या आंदोलकांना थांबवण्यासाठी दिल्लीत शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांची धरपकड केली. या सर्व घडामोडीनंतर राजकीय पडसाद उमटले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली असून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
धर्मेंद्र प्रधान यांचा ते राजीनामाही घेऊ शकत नाहीयेत
राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे तरुण विरोधी पंतप्रधान आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा ते राजीनामाही घेऊ शकत नाहीयेत. आतापर्यंत 152 पेपर लीकझाले. त्याचा फटका 7.5 कोटी विद्यार्थ्यांना बसला. शिक्षा मात्र कोणालाच झाली नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पेपर लीक करणारे मात्र मोकाट
तसेच तरुण आता चांगल्या शिक्षणासाठी प्रश्न उपस्थित करत आहेत. पण या उत्तर म्हणून या तरुणांवर लाठीचार्ज केला जातोय. पेपर लीक करणारे मात्र मोकाट आहेत. मूलभूत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना फरफटत नेलं जात आहे. त्यांना मारहाण केली जात आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
संसदेचे कामकाज अनेकवेळा तहकूब
दरम्यान, काँग्रेसने संसदेतही तरुणांच्या या आंदोलनाचा मुद्दा लावून धरला आहे. खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी सीजेपीच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर इतर विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नंतर संसदेचे कामकाज अनेकवेळा तहकूब करावे लागले. आता सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. सीजेपीने आपल्या मागण्या सरकारदरबाबरी ठेवल्या आहेत. आता यावर काय निर्णय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
