Mohan Bhagwat:…तर एक मुलं असणं अत्यंत वाईट, का म्हणाले असं सरसंघचालक मोहन भागवत? लग्नाच्या वयाविषयी सुद्धा केले मोठे भाष्य
RSS Chief Mohan Bhagwat: सरकारने देशात हम दो, हमारे दो असा संतती नियमनाचा हिरारीने प्रचार केला असला तरी सरसंघचालक मोहन भागवत यांना मात्र हा सल्ला काही मान्य नाही, असं दिसत आहे. त्यांनी याविषयी मोठे वक्तव्य केलं आहे.

RSS Chief Mohan Bhagwat: गेल्या तीन दशकात भारतात हम दो, हमारे दो असा संतती नियमनाचा प्रचार सरकारने केला. त्यापूर्वी तर संतती नियमनासाठी देशात काय जहाल प्रयोग करण्यात आले हे सर्वश्रूत आहेत. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी हा प्रकार करण्यात आला होता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंजाब दौऱ्यावर असताना मोठे वक्तव्य केले आहे. हिंदू दाम्पत्याला तीन अपत्य हवीत असे मत त्यांनी मांडलं आहे. तर लग्नाचे वय हे 19-25 असावे, त्यामुळे कौटुंबिक वाद कमी होतील असा त्यांचा तर्क आहे. त्यांनी पंजाबसह देशातील तरुण पिढी ही अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याबाबत चिंताही व्यक्त केली.
तीन मुलांची वकिली का?
सरसंघचालकांनी देशाच्या लोकसंख्येतील बदलाविषयी आणि अंमली पदार्थाच्या विळख्यात तरुणाई ओढल्या जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली. देशहितासाठी तीन मुलं असणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अनेक संशोधनातून हे सिद्ध झाल्याचे ते म्हणाले. आपल्या मुलांची संख्या कमी होत आहे आणि त्यांची वाढत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. तीन मुलं असणं सर्वोत्तम आहे, दोन मुलं असणं वाईट, तर एक मुलं जन्माला घालणं हे अत्यंत वाईट असल्याचे ते म्हणाले.
अंमली पदार्थांच्या प्रश्नावर चिंता
पंजाब राज्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या प्रश्नावर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मुलांचे व्यसनाच्या गर्तेत जाणे अथवा त्यांच्या आत्महत्येमागे सर्वात मोठे कारण त्यांचा एकटेपणा आहे. जेव्हा मुलं घराबाहेर पडतात. त्यांना ठेच लागते, तेव्हा त्याला कुणाकडे रडावे हे कळत नाही.पालक मुलांना वेळ देत नाहीत. त्यामुळे ते एकतर व्यसनांच्या आहारी जातात अथवा आत्महत्या करतात असे मोहन भागवत म्हणाले. पालकांनी आपल्या मुलाचे दुःख आणि अपयश ऐकावे आणि त्याला यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
लग्नाचे वय काय असावे?
सरसंघचालकांनी लग्नाच्या वयाबद्दलही भाष्य केले. 19 ते 25 वर्षांच्या वयात लग्न व्हायला हवे. त्यामुळे कौटुंबिक कलह कमी होतील. पंजाबसह देशाच्या लोकसंख्येत बदल होत आहे आणि हे बदल थांबवण्यासाठी संघ सतत प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. तर हिंदू धर्म नाही तर जीवन पद्धती असल्याचे ते म्हणाले. सर्व लोकांनी आपापल्या पद्धतीने आपले जीवन आणि पूजा पद्धती स्वीकारावी. एकमेकांशी वैरभाव नसावा असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
