NEET Re Exam : बनावट टेलिग्राम चॅनेलवर कठोर कारवाई होणार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचना
Dharmendra Pradhan : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन नीट परीक्षा सुरक्षित, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परीक्षा सुरक्षित, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत शिक्षण मंत्रालय आणि NTA चे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. परीक्षेपूर्वी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा आणि संभाव्य त्रुटींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
टेलिग्राम चॅनलबाबत कठोर भूमिका
आज झालेल्या बैठकीत सरकारने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि बनावट माहितीवरही कठोर भूमिका घेतली आहे. मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत बनावट पेपर लीक, दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्स आणि भीती निर्माण करणाऱ्या टेलिग्राम चॅनेल्सबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
परीक्षेपूर्वी टेलिग्राम चॅनेल सक्रिय होतात
परीक्षेपूर्वी अनेक टेलिग्राम चॅनेल अचानक सक्रिय होतात आणि बनावट पेपर लीक, क्लिकबेट मेसेजेस तसेच अप्रमाणित माहिती पसरवून विद्यार्थी आणि पालकांमध्ये घबराट निर्माण करतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक लिंक विद्यार्थ्यांना बनावट ग्रुप्स आणि ऑटोमेटेड बॉट्सकडे वळवत असल्याचेही निदर्शनास आले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, काही संशयास्पद चॅनेल्स मर्यादित मोबाईल नंबरद्वारे चालवले जात असून, यामागे संघटित नेटवर्क कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
खोटी माहिती पसरवणाऱ्या चॅनेलवर कारवाई करण्याचे निर्देश
नीट पेपरफुटी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी फेक माहिती पसरवणाऱ्या चॅनेल्सची ओळख पटवून त्यांना तातडीने ब्लॉक आणि हटवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, सोशल मीडिया कंपन्यांनी शिक्षण मंत्रालय, NTA आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत समन्वय साधून जलद कारवाई करणे आवश्यक आहे. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांना अफवांपासून सुरक्षित ठेवणे आणि परीक्षा व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम राखणे हीच मोठी प्राथमिकता आहे.
