Nitin Gadkari : मलाच लाज वाटते, त्यामुळे मी.. मुंबई-गोवा महामार्गावर नितीन गडकरींच मोठं वक्तव्य
Nitin Gadkari : मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण अजूनही पूर्ण होत नाहीय. त्या संदर्भात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलं. नितीन गडकरी यांनी या देशात अनेक किलोमीटर लांबीचे हायवे बांधले आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाच चौपदरीकरण रखडलं आहे. त्यावरुन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली आहे. गडकरींनी या महामार्गबद्दल बोलताना त्यांच्या मनात जे आहे ते सांगितलं. नितीन गडकरींनी या महामार्गाच्या कामाला जो विलंब लागतोय, त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी पणजीमध्ये त्यांनी पोरवोरिम येथे सहालेनच्या एलिवेटेड रोड कॉरिडोरचं उद्घाटन केलं. त्यावेळी मुंबई-गोवा महामार्गाबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘या महामार्गाला इतका उशिर झालाय की, लाज वाटते’ नितीन गडकरींनी आधीच ठरवलेलं की, “मुंबई-गोवा महामार्गाच्य चौपदरीकरणाचं काम जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा उद्घाटनाला जायचं नाही. मला माझी लाज वाटते, इतका उशीर झालाय”
या मुद्यावर मंगळवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचं गडकरींनी सांगितलं. ऑक्टोंबर महिन्यात मी स्वत: मुंबई ते गोवा रस्ते मार्गाने प्रवास करुन हायवेचं निरीक्षण करणार आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर रस्त्याने ते थेट गोव्याला जाणार आहेत. रस्त्यावर काय सुविधा आहेत, रस्ता प्रवास करण्यायोग्य आहे का? याची तपासणी स्वत: हा गडकरी करतील.
440 किलोमीटरचा हायवे
“इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये होणारा विलंब आणि खराब कामांसाठी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई सुरु ठेवतील” असं नितीन गडकरी म्हणाले. “एकावर्षात जास्तीत जास्त ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करुन जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा त्यांना रेकॉर्ड बनवायचा आहे. आता अशा प्रकारची कारवाई थांबवणार नाही” असं गडकरी बोलले. मुंबई-गोवा हायवेचं चौपदरीकरण 440 किलोमीटरच आहे. या प्रोजेक्टला कित्येकदा विलंब झालाय. या महामार्गावर जितकं काम झालय, त्यात सुद्धा पाऊस आणि खड्ड्यामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या. या हायवेवर अजून डायवर्जन, पाणी साचणं, दुरुस्ती आणि ट्रॅफिक जॅम सारख्या समस्या आहेत. मे महिन्यात खरपाडा टोल प्लाजावर टोल वसूली सुरु झालीय.
