Vice Presidential Election 2025 : फक्त दुसऱ्यांवर भिस्त ! उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार स्वत: मतदान का करू शकत नाहीत ?
Vice Presidential Election : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज थोड्याच वेळात मतदान सुरू होईल. यावेळी सीपी राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात मुकाबला आहे. आजच्या मतदानादरम्यान 781 खासदार मत देतील, पण या दोन्ही उमेदवारांपैकी कोणीच स्वत: मतदान करू शकणार नाही. असं का ? चला जाणून घेऊया कारण

आज भारताला नवे उपराष्ट्रपती मिळतील. गेल्या महिन्यात प्रकृतीच्या कारणास्तव जगदीश धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडमूक आज म्हणजेच 9 सप्टेंबरला जाहीर झालीय एनडीएतर्फे सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीतर्फे बी. सुदर्शन रेड्डी हे या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. संसद भवन संकुलातील वसुधा येथील कक्ष क्रमांक एफ-१०१ मध्ये आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर मतमोजणी होईल आणि निकालही आज जाहीर केला जाईल.
पण उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते, त्यात कोण कोणाला मतदान करू शकते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? लक्षात घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक लढवणारे दोन्ही उमेदवार या निवडणुकीत स्वतः मात्र मतदान करू शकत नाहीत.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाची लढत ?
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे तर विरोधी इंडिया अलायन्सने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. संख्याबळाचे गणित एनडीएच्या बाजूने आहे, परंतु विरोधकांना आशा आहे की ‘विवेकबुद्धीचा आवाज’ वापरून काही अतिरिक्त मते मिळू शकतात.
कोण करू शकतं मतदान ?
उपराष्ट्रपतींची निवडणूक ही राष्ट्रपती निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी असते. राष्ट्रपती निवडणुकीत खासदारांसोबतच राज्य विधानसभांचे सदस्यही मतदान करतात, तर उपराष्ट्रपती निवडणुकीत फक्त खासदारच मतदान करतात. यावेळी एकूण 781 खासदार मतदान करण्यास पात्र आहेत. यामध्ये लोकसभेचे 542 सदस्य (सभापती वगळता) आणि राज्यसभेचे 239 सदस्य आहेत.
कसं होतं मतदान ?
गुप्त मतदानाद्वारे हे मतदान केलं जातं. या निवडणुकीत कोणताही पक्षाचा व्हीप लागू नाही. याचा अर्थ खासदारांना त्यांच्या पसंती आणि प्राधान्याच्या आधारावर (प्राधान्य मतदान प्रणाली) मतदान करावे लागेल. म्हणजेच, त्यांना मतपत्रिकेवर त्यांची पहिली, दुसरी आणि तिसरी पसंती चिन्हांकित करावी लागेल. ज्या उमेदवाराला बहुमत मिळते म्हणजेच वैध मतांच्या अर्ध्याहून अधिक मते मिळतात तो जिंकतो.
दोन्ही उमेदवार का करू शकत नाहीत मतदान ?
खरंतर, या निवडणुकीत फक्त खासदारांनाच मतदानाचा अधिकार आहे. म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व निवडून आलेले आणि नामांकित खासदार या प्रक्रियेचा एक भाग आहेत. मात्र आजचे दोन्ही उमेदवार, म्हणजेच सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी, यांच्यापैकी कोणीही सध्या संसद सदस्य नाही. त्यामुळे ते स्वतः निवडणूक लढवत असले तरी, त्यांना त्यांच्या विजयासाठी इतर खासदारांवर अवलंबून राहावे लागेल.
आजचा कार्यक्रम
आज संसद भवन संकुलात होणाऱ्या मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम मतदान करतील. त्यांच्यानंतर पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे खासदार मतदान करतील. मतदानानंतर पंतप्रधान मोदी थेट पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. मतदान संपल्यानंतर संध्याकाळी निकाल जाहीर केले जातील.
उपराष्ट्रपती हे केवळ राज्यसभेचे अध्यक्ष नव्हे तर सभागृहाचे कामकाज सुरळीत चालविण्याची मोठी जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर असते. म्हणूनच ही निवडणूक केवळ पदाचा प्रश्न नाही तर संसदीय राजकारणाची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा वळण आहे.
