IMD Weather Update: आता ऑक्टोबरमध्ये नवं संकट येणार, हवामान खात्याच्या अंदाजाने खळबळ; शेतकऱ्यांची चिंता वाढली!
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. मात्र संकट अजूनही टळलेले नाही. ऑक्टोबर महिना आणखी आव्हानात्मक ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशांतील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. मात्र संकट अजूनही टळलेले नाही. ऑक्टोबर महिना आणखी आव्हानात्मक ठरणार आहे. हवामान विभागाने ऑक्टोबरमध्ये संपूर्ण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यात सामान्य पातळीपेक्षा 115% जास्त पाऊस पडणार आहे अशी माहिती आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या 115% पाऊस पडण्याची शक्यता
मृत्युंजय महापात्रा यांनी पुढील ऑक्टोबर महिन्यातील पावसाच्या अंदाजाबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला. आता ऑक्टोबरमध्ये गेल्या 50 वर्षांच्या सरासरीच्या 115% पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबरमधील पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, अनेकांची पिके पाण्याखाली गेली आहेत, शेतकरी अडचणीत असताना आता त्याच्यासमोर नवं संकट येणार आहे.
भारतात पावसाळा सप्टेंबर अखेरपर्यंत संपतो, मात्र यंदा मान्सून लांबला आहे. देशाच्या काही भागात अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे. आता ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके वाचलेली आहेत, त्यांना आता नवा धोका निर्माण झाला आहे.
जास्त पाऊस पडण्याचे कारण काय?
दरवर्षी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणारे ओले वारे उत्तरेकडे आणि पश्चिमेकडे जातात. जेव्हा हे वारे उत्तर भारतातील थंड वारे आणि पश्चिमेकडील विक्षोभांशी टक्कर देतात तेव्हा मुसळधार पाऊस पडतो. तसाच पाऊस आता पडत आहे. आणखी एक कारण म्हणजे जागतिक तापमानवाढीमुळे मान्सून आणि इतर हवामान प्रणाली असामान्यपणे सक्रिय होत आहे, त्यामुळे सध्या पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे.
पिकांचे मोठे नुकसान
ऑक्टोबरमध्ये भात, मका आणि सोयाबीनच्या पिकांची काढणी केली जाते. मात्र यंदा ऑक्टोबरमध्ये मुसळधार पावसाची शक्यत आहे. त्यामुळे या पिकांच्या काढणीवर परिणाम होऊ शकतो आणि पिकांचेही नुकसान होऊ शकते. तसेच इतर पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता आहे. याचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकते. तसेच पावसामुळे शहरी भागात पाणी साचते, त्यामुळे शहरी भागातही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
