टी शर्ट काढले, तुफान नारेबाजी, AI Summit मध्ये युथ काँग्रेसचा मोठा गोंधळ, Video ने खळबळ

India AI Impact Summit 2026: दिल्लीत एआय समिटीमध्ये मोठा गोंधळ उडाला. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत आता घुसले. त्यांनी PM is Compromised असे नारे दिले. त्यांनी एका मंचावर जात टी-शर्ट काढले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टी शर्ट काढले, तुफान नारेबाजी, AI Summit मध्ये युथ काँग्रेसचा मोठा गोंधळ, Video ने खळबळ
युथ काँग्रेसचा गोंधळ
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 20, 2026 | 3:20 PM

India AI Impact Summit 2026: राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपममध्ये सध्या एआयचा जागर सुरू आहे. हाय प्रोफाईल एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षा रक्षकांना चकमा देत आत शिरले आणि त्यांनी गोंधळ घातला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा बाजी केली. PM is Compromised असे नारे त्यांनी दिले. त्यांनी टी शर्ट काढले आणि घोषणाबाजी केली. हे आंदोलन सुरू असताना या समिटमध्ये देश-परदेशातील अनेक प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. युथ काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक बॅनर आणि पोस्टर घेऊन मुख्य हॉलजवळ धडकले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा हालली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना तातडीने ताब्यात घेतले. त्यांना समिटच्या बाहेर काढण्यात आले. याविषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

एआय समिट म्हणजे पीआर तमाशा

युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप लावला आहे की, भारत सरकार इंडो-युएस ट्रेड डीलप्रकरणात अमेरिका आणि उद्योजकांच्या दबावापुढे झुकले आहे. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांना कॉम्प्रोमाईज पीएम असल्याचा आरोप केला आहे. पण काँग्रेस देशाच्या हिताला बाधा येऊ देणार नाही असा दावा त्यांनी केला. या आंदोलनापूर्वी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी एआय समिटवर नाराजी व्यक्त केली होती. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना हा पीआर तमाशा असल्याचा आरोप केला होता. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी समिटच्या व्यवस्थापनावर आणि असुविधांवर नाराजी व्यक्त केली. युथ काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर काही जणांना समिटच्या बाहेर काढले आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भारत मंडपमध्ये देशातील सर्वात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बायोमॅट्रिक्स आणि QR कोड आधारित पास व्यवस्था आहे. त्याशिवाय या ठिकाणी प्रवेश करता येत नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कुणाच्या पासचा वापर केला. त्यांनी पास कुठून मिळवले याविषयीचा तपास पोलीस करत आहेत. त्याआधारे सुरक्षा व्यवस्थेत कुठे चूक झाली आणि आंदोलनकर्ते थेट मुख्य मंचापर्यत दाखल झाले कसे याचा शोध घेण्यात येत आहे.

भाजपचा हल्लाबोल

या आंदोलनाविरोधात भाजपने संताप व्यक्त केला. भाजपने या आंदोलनावर तिखट हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आता काँग्रेसची कीव येत आहे. राहुल गांधी यांच्या निर्देशानंतर आंदोलनकर्ते या आंतरराष्ट्रीय एआय शिखर संमेलनात घुसले आणि त्यांनी गोंधळ घातला. काँग्रेस शहरी नक्षलींप्रमाणे वागत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला. काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.