गडचिरोली जिल्ह्यामध्ये गावपातळीवर महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत काम करणाऱ्या युवा ग्रामपरिवर्तकांनी देखील दारूबंदीला पाठिंबा दिला आहे. मागील 3 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या अभ्यासानुसार त्यांनी जिल्ह्यात दारूबंदी आवश्यक असल्याचं सांगतानाच ‘व्यसनमुक्त समाज’ काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवत या दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी देखील केली आहे.
-
-
आंबटपल्ली ग्रामपंचायतचे संकेत आहेर म्हणाले, “राज्यातील आदर्श गावे म्हणून प्रसिद्धी असलेली राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, लेखामेंढा ही गावे दारूबंदीमुळेच पुढे गेली. दारूमुळे गावात फुट पडून गावाचा विकास खुंटतो. त्यामुळे दारूबंदी कायम ठेवावी.”
-
-
ग्रामपंचायत जेप्राचे अश्विनी जेट्टीवार यांनी देखील दारूबंदी न उठवता त्यावर अधिक कडक निर्बंध लादावे, अशी मागणी केलीय.
-
-
“दारू सुरु करा म्हणणाऱ्यांनी आधी जिल्ह्यातील महिलांशी चर्चा करावी. अशी मागणी करणाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थ्यांसाठी जिल्ह्यातील लोकांना धोक्यात घालू नये, असं मत गडचिरोलीचा रहिवासी आणि ग्रामपंचायत अरततोंडीचे ग्रामपरिवर्तक रवींद्र चुनारकर यांनी व्यक्त केलं.
-
-
“गडचिरोली जिल्ह्यात दारू सुरु करणे म्हणजे युवकांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यासारखं आहे. ग्रामविकासामध्ये दारू केवढा मोठा अडथळा आहे हे दारूबंदी उठवण्याची भाषा बोलणाऱ्यांनी तपासावं,” असं मत जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत येथे काम करणाऱ्या गजानन आंबोरे यांनी व्यक्त केलं आहे.
-
-
मोरावाही ग्रामपंचायतचे ग्रामपरिवर्तक शुभम राऊत म्हणाले, “ज्या गावात दारू सहज उपलब्ध होत नाही, तिथे लोक दारू पिण्याचे टाळतात किंवा दारूचे अत्यल्प सेवन केले जाते हा माझा गावासोबत काम करतानाचा अनुभव आहे, दारूसुरु करणे म्हणजे विकासाला खीळ बसवणे होय.”
-
-
“दारूबंदी उठवून जिल्ह्याचा विकास होणारं नाही, तर जिल्हा भकास होईल,” असं मत ग्रामपंचायत कोठारीचे ग्रामपरिवर्तक दिलीप शिखरे यांनी व्यक्त केलं.
-
-
दारू सुरु झाल्यास कौटुंबिक हिंसाचार वाढेल, त्यामुळे दारूबंदी कायम ठेवावी, असं मत ग्रामपंचायत चीरचाडमधील ललित जामुणकर यांनी व्यक्त केलं.