पाच खासदार फोडा, केंद्रात मंत्रीपद घ्या, अजित पवार यांना ऑफर असल्याचा संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

शरद पवार गटातील सर्व खासदारांना मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले. काही लोकांनी लाज शिल्लक ठेवली आहे. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नाही, तर ते महाराष्ट्राशी बेईमानी करत आहे

पाच खासदार फोडा, केंद्रात मंत्रीपद घ्या, अजित पवार यांना ऑफर असल्याचा संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
sanjay raut
Jitendra Zavar | Updated on: Dec 13, 2024 | 10:39 AM

राज्यात महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. महाविकास आघाडीचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात आहे, असा दावा महायुतीकडून केला जात आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला घेरले आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील खासदार फोडण्यासाठी अजित पवार यांच्यापुढे काय प्रलोभन ठेवले त्यासंदर्भातील गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शरद पवार यांच्या गटातील खासदार अजित पवार यांच्या गटात जाऊ शकतात का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, माझी माहितीनुसार अजित पवार यांना एक ऑफर दिली आहे. त्यांना सांगितले गेले आहे की तुम्ही पवार साहेबांचे (शरद पवार) यांचे पाच खासदार फोडून घेऊ या. मग तुमचे सहा खासदार होतील. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला मंत्रिपद देऊ. कारण केंद्रात सहकारी पक्षाला मंत्रिपदासाठी सहा खासदार हवे आहे, असे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना भाजपकडून सांगितले आहे, अशी मला माहिती मिळाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

राऊत पुढे म्हणाले, वयाच्या ८४ व्या वर्षी शरद पवार यांनी प्रचंड मेहनत करुन दहा खासदार निवडून आणले आहे. आता ते खासदार फोडण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे फुटणाऱ्यास लाज वाटली पाहिजे. मी पक्ष सोडून जाण्याचे पाप मी केले असते, तर माझ्यात बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या नजरेस नजर भिडवण्याची हिंमत झाली नसती. मला वाटले असते मी पाप केले आहे, माझे मन मला खाल्ले असते. परंतु या लोकांनी लाज सोडली आहे.

शरद पवार गटाचे खासदार नॉट रिचेबल नाही

शरद पवार गटाचे खासदार नॉट रिचेबल आहे का? यावर राऊत म्हणाले, शरद पवार गटातील सर्व खासदारांना मी पवार साहेबांच्या बंगल्यावर पाहिले. काही लोकांनी लाज शिल्लक ठेवली आहे. जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेईमानी करत नाही, तर ते महाराष्ट्राशी बेईमानी करत आहे. हे फार काही दिवस टिकणार नाही. प्रत्येक गोष्टीला अंत असतो. जगात हुकुमशाहीचा अंत लोकांच्या हातून झालेला आहे.

शरद पवार यांच्या पक्षात अस्वस्थात आहे, तशी महाविकास आघाडीतील आमदार आणि खासदार अस्वस्थ आहे त्यावर बोलताना राऊत म्हणाले, त्यांच्याकडे पैसा आहे. सत्ता आहे. ईडी, सीबीआय आहे. या यंत्रणा आमच्याकडे असत्या तर १५ मिनिटांत भाजप रिकामी झाले असते. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या असत्या तर भाजपची लोक देश सोडून गेली असती.

Follow Us