ठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत ‘सामंतशाही’ : आशिष शेलार

| Updated on: Jan 17, 2021 | 4:42 PM

भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्ला चढवलाय.

ठाकरे सरकारकडून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालत सामंतशाही : आशिष शेलार
Ashish Shelar
Follow us on

मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर विद्यापीठाच्या मुद्द्यावरुन जोरदार हल्ला चढवलाय. “राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात “सामंतशाही” सुरु आहे,” असा घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला. तसेच नॅक मुल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पध्दतीने कुलसचिवांची नियुक्ती केल्यानं त्याचा विद्यापीठाच्या मुल्यांकनावर परिणाम हाईल. इथेही सरकारचा अहंकारच दिसून येतोय, असंही शेलार म्हणाले (Ashish Shelar criticize Thackeray Government over appointments in Mumbai University).

आशिष शेलार म्हणाले, “मुंबई विद्यापीठाची नॅक मूल्यांकनांची तयारी सुरु असतानाच राज्य शासनाने 8 जानेवारी रोजी अचानक मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कुलसचिवांची नियुक्ती केली. विद्यापीठ कायद्याप्रमाणे कुलगुरुंनी प्रभारी कुलसचिव नेमला आहे. असं असतानाही कोणतीही अनागोंदी नसतानाही राज्य सरकारने विद्यापीठात पुन्हा ढवळाढवळ केली. कुलगुरुंनी 14 जानेवारी रोजी राज्य सरकारला पत्र लिहून नॅक मूल्यांकन असल्याने आता कुलसचिव बदलल्यास त्याचा मूल्यांकनावर परिणाम होईल हे सांगितलं. त्यानंतर देखील सरकारने विद्यापीठावर मनमानी करून कुलसचिव थोपला.”

“या बदलाचा नॅक मानांकनावर परिणाम झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील. विद्यापीठांचे सरकारी महामंडळ करण्याच्या दिशेने वाटचाल चालली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सरकारी हस्तक्षेप नको असेच म्हटले आहे. मात्र अहंकारी ठाकरे सरकारने मनमानी सुरुच ठेवली आहे. हा विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला आहे,” असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला.

“उच्च शिक्षण मंत्र्यांनी पदभार घेताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले”

आशिष शेलार म्हणाले, “राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांची स्वायत्ता अशीच धोक्यात आली आहे. उच्च शिक्षण मंत्र्यांनी पदभार घेताच विद्यापीठांकडे आर्थिक हिशेब मागितले होते. त्याला विरोध होताच सारवासारव करण्यात आली. त्यानंतर युजीसी, विद्यापीठ, कुलपती, कुलगुरू, सीनेट यांना डावलून सरकारने अंतिम वर्ष परिक्षा रद्द करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता. त्यालाही विरोध झाला आणि न्यायालयाने, युजीसीने फटकारल्यानंतर परिक्षा घ्याव्या लागल्या. ठाकरे सरकारचा हा कारभार विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा, स्वायत्ता याला इजा करणारे आहे.”

“आता आपल्या मर्जीतील कुलसचिवांच्या नियुक्त्या करुन विद्यापीठांवर सरकारने ताबा मिळवला आहे. विद्यार्थी हिताच्या आड येणाऱ्या या निर्णयाला आम्ही विरोध करतो. आम्ही संघर्ष करु,” असा इशारा शेलारांनी दिला.

हेही वाचा :

घराबाहेर पडण्यासाठीच रस्त्यावर उतरण्याचा बहाणा; शेलारांची खोचक टीका

मालवणीत याकूब मेमनची सत्ता आहे काय?; राम जन्मभूमीचे पोस्टर फाडल्याने आशिष शेलार संतप्त

भाजप नेते आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; अर्ध्यातासापासून खलबतं सुरू

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar criticize Thackeray Government over appointments in Mumbai University