West Bengal Result : भव्य विजयाचा भाजपला पहिला फायदा म्हणजे राज्यसभेत ताकद वाढणार, अजून किती खासदार पाठवता येणार?
West Bengal Election Result : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भव्य विजयाचे भाजपला बरेच राजकीय फायदे मिळणार आहेत. या विजयाचे दूरगामी परिणाम आहेत. त्यात सर्वबाजूंनी भाजपचा फायदाच फायदा आहे.

पश्चिम बंगालच्या जनतेने ऐतिहासिक कौल दिला आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झालेत. भाजपने घवघवीत यश संपादन केलं आहे. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. बंगालमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे. तृणमुल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. पश्चिम बंगालच्या मतदारांनी एकप्रकारे मतपेटीतून आपला राग व्यक्त केला आहे. 293 पैकी 206 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. फाल्टा विधानसभेच्या एका जागेवर 21 मे रोजी फेर मतदान होणार आहे. तिथे 24 मे रोजी निकाल येणार आहे. पश्चिम बंगालमधल्या या जबरदस्त प्रदर्शनाचा भाजपला राज्यसभेत फायदा होणार आहे. राज्यसभेत भाजपची ताकद वाढणार आहे. ऑगस्ट 2029 मध्ये भाजपला पश्चिम बंगालमधून अनेक नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्याची संधी मिळेल.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294, लोकसभेच्या 42 जागा आहेत. राज्यसभेच्या 16 जागा या राज्याकडे आहेत. ऑगस्ट 2029 मध्ये पाच जागा रिकामी होणार आहेत. या सर्व पाचही जागा सध्या तृणमुल काँग्रेसकडे आहेत. 2029 लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला बंगालमधून पाच सदस्यांना राज्यसभेवर पाठवता येईल. विद्यमान पाच जागांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे 29 खासदार आहेत. तेच भाजपची सदस्य संख्या 113 आहे. भाजपला मागच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला. यावेळी त्यांनी तृणमुल काँग्रेसकडून त्यांचा बंगालचा गड खेचून आणला.
ते भाजपमधील मोठे नेते बनले
ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये आलेले सुवेंदू अधिकारी जायंट किलर ठरले आहेत. स्ट्रीट फायटर म्हणून ओळख असलेल्या ममता बॅनर्जींविरोधात त्यांनी रस्त्यापासून सभागृहापर्यंत लढाई लढली. अखेर त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. भवानीपूरमधून त्यांनी ममता बॅनर्जी यांना हरवलं. मागच्यावेळी 2021 मध्ये नंदीग्राममध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांना पराभूत केलं होतं. सलग दोनवेळा हायप्रोफाईल लढतीत मुख्यमंत्र्यांना पराभूत केल्यामुळे ते भाजपमधील मोठे नेते बनले आहेत. भवानीपूरमधून विजयाचं प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हरवणं खूप गरजेच होतं असं सांगितलं. ही ममता बॅनर्जी यांची राजकीय रिटायरमेंट असल्याचं ते म्हणाले.
