ठाकरे सरकारच्या नेत्यांनी काम धंदे सोडले, त्यांचा गुन्ह्यांमध्ये वेळ जातोय, निलेश राणेंचा हल्ला

| Updated on: Feb 14, 2021 | 8:29 AM

ठाकरे सरकारच्या नेत्यांनी कामधंदे सोडलेत त्यामुळे त्यांचा गुन्हामध्ये वेळ जातोय, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केलाय. | Nilesh rane

ठाकरे सरकारच्या नेत्यांनी काम धंदे सोडले, त्यांचा गुन्ह्यांमध्ये वेळ जातोय, निलेश राणेंचा हल्ला
निलेश राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारच्या नेत्यांनी कामधंदे सोडलेत त्यामुळे त्यांचा गुन्हामध्ये वेळ जातोय, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केलाय. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन त्यांनी वनमंत्री संजय राठोड यांना धारेवर धरलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना त्यांनी जितेंद्र आव्हाज, धनंजय मुंडे आणि राठोड यांच्यावर बोचऱ्या शब्दात वार केले. (BJP Nilesh Rane Attacked On Mahavikas Aaghadi leader)

मंत्र्यांनी कामधंदे सोडले

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी कामधंदे सोडले आहेत. त्यांचा केवळ आणि केवळ गुन्ह्यांमध्ये वेळ जातोय. यापूर्वीही या नेत्यांनी असेच गुन्हे केले. एका इंजीनियरला घरी नेऊन मारहाण केली, असं सांगतानाच जो चुकला असेल तर चुकला म्हणा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच करायचे. बाळासाहेबांनी घाणेरड्या लोकांना खतपाणई घातलं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींवर आरोप झाले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना तातडीने मुख्यमंत्रीपदावरून काढलं आणि नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं होतं, असं निलेश राणे म्हणाले.

मंत्र्याला हाकला, घरी पाठवा, चौकशी होत राहील

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यातील ऑडिओ तर समजतो ना… आवाज समजतो ना… तुमच्या मंत्र्याचा आवाजही तुम्हाला माहीत नाही?… त्यांना बाहेर काढा… खतपाणी का घालताय?…. मंत्र्याला हाकला, घरी पाठवा, चौकशी होत राहील, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

निलेश राणे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

मागे जितेंद्र आव्हाड यांच्या घरी इंजीनियरला मारहाण करण्यात आली. त्यांच्याविरोधात एफआयआर केला का? या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही होते. आणखी काय हवं होतं. स्वत: आव्हाडांनीही इंजीनियरला मारल्याचं सांगितलं. मग एफआयआरमध्ये आव्हाडांचं नाव का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

निलेश राणे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली. दुसरं लग्न लपवलं. त्यांची आमदारकी रद्द झाली की नाही? ‘पोरं लपवा, बायका लपवा’ हे काय आम्ही सांगितलं होतं? याप्रकरणात आम्ही बदनामी केली होती? त्यांनीच त्यांची माहिती दिली. मग ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी केला.

ठाकरे सरकारचे दोन वर्षे झाकाझाकीत

ठाकरे सरकारचा दोन वर्षाचा काळ केवळ झाकाझाकीतच गेला आहे. बाळासाहेब ठाकरे करारी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे हा करारीपणा एक टक्केही नाही. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या लेकावर तरी कारवाई केली का? असा सवालही त्यांनी विचारला. (bjp leader nilesh rane reaction on Pooja Chavan suicide case)

हे ही वाचा :

मंत्र्याला हाकला, घरी पाठवा; चौकशी होत राहील; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलेश राणे आक्रमक