ED : मोदी सरकारच्या काळात 27 पटींनी वाढल्या ईडी कारवाया, खुद्द मंत्र्यांनीच सांगितली संपूर्ण आकडेवारी, वाचा सविस्तर
2014-2022 या वर्षात 3,010 इतक्या ईडी कारवाया करण्यात आल्या. तर 2004-2014 या काळात अवघ्या 112 ईडी कारवाया करण्यात आल्या.
मुंबई : 2014 ते 2022 या काळात किती ईडी कारवायांचा (ED Raids) करण्यात आल्या, त्याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यसभेत (Rajya Sabha) उपस्थित करण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती मंत्री महोदयांनी दिली आहे. 2014 पासून देशात भाजपची केंद्रात सत्ता आहे. भाजपचं (BJP Government) सरकार आल्यापासून देशात ईडीचा गैरवापर केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप वारंवार महाराष्ट्रातील भाजपच्या विरोधातील पक्षांनी केला आहे. त्यामुळे आता समोर आलेल्या आकडेवारीला महत्त्व प्राप्त झालं आहे. 2004 ते 2014 या काळात नेमक्या किती कारवाया ईडीकडून करण्यात आल्या होत्या, त्याचाही लेखाजोखा समोर आला आहे. राज्यसभेत मंगळवारी अर्थखात्याचे कनिष्ठ मंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतीच माहिती राज्यसभेमध्ये दिली. 2004 ते 2014 मध्ये 2004 ते 2014 च्या तुलनेत तब्बल 27 पटींनी ईडीच्या कारवाया वाढल्याची आकडेवारी लेखी उत्तरात देण्यात आली आहे.
2014-2022 या वर्षात 3,010 इतक्या ईडी कारवाया करण्यात आल्या. तर 2004-2014 या काळात अवघ्या 112 ईडी कारवाया करण्यात आल्या होत्या, अशी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 27 पटींनी ईडी कारवाया वाढल्या असल्याचं या आकडेवारीवरुन अधोरेखित झालंय.
कशामुळे वाढल्या कारवाया?
मंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ईडी कारवाया का वाढल्या, याबाबत स्पष्टीकरणही दिलेलं आहे. प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी ईडीकडून कारवाईचा धडाका सुरु आहे. त्यामुळे 2014च्या आधी तपासात ढिलाईपणा आणि दिरंगाई करण्यात आली होती, तशी दिलंगाई आणि ढिलाईपणा न करता वेगानं प्रकरण निकाली काढण्यासाठी ईडी कारवाया वाढल्या असल्याचं त्यांनी नमूद केलंय. वेळेत ही प्रकरण निकाली काढायची असतील, तर त्यासाठी या कारवाया गरजेच्या आहेत, असंही ते म्हणालेत.
2014-15 ते 2021-22 या आठ वर्षांच्या काळा 3,010 ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यात आतापर्यंत तब्बल 99 हजार 356 कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण 888 प्रकरणांमध्ये 23 जणांना दोषी करण्यात आले असून तर 869.3 कोटी रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
मनी लॉन्ड्रिग कायद्या आल्यानंतरच्या नऊ वर्षांच्या सुरुवातीच्या काळात तुलनेने कमी कारवाई करण्यात आल्याची आकडेवारीही समोर आली आहे. या काळात 104 तक्रारी दाखल करण्यात आल्या. दरम्यान, या काळात कुणावरही दोष सिद्ध झाले नाही, अशीही माहिती लेखी उत्तरात देण्यात आली. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ही आकडेवारी समोर आली आहे.