मोठी बातमी: राज्यपालनियुक्त 12 जागांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
आता लवकरच महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाईल. | Governor appointed MLC
मुंबई: विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागा भरण्याच्या प्रस्तावावर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रस्ताव आला, तो एकमताने मंजूर झाला, असे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच महाविकासआघाडी सरकारकडून याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रितसर प्रस्ताव पाठवला जाईल. यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Mahavikas Aghadi govt pass resolution in cabinet meeting about Governor appointed MLC )
याशिवाय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी आणि कांद्याच्या प्रश्नावरही चर्चा झाली. त्यानुसार, शिवभोजन थाळी मार्च महिन्यापर्यंत 5 रुपयांत पुरवण्याचा निर्णय झाला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी कांदा उत्पादकांशी चर्चा करुन तोडगा काढतील, अशी माहितीही भुजबळ यांनी प्रसारमध्यांना दिली. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे आणि नाशिकमधील कांदा उत्पादक, शेतकऱ्यांची चर्चा सुरु आहे. यावेळी कांदा उत्पादकांकडून साठवणुकीवरील मर्यादा हटवण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यपालनियुक्त 12 सदस्यांच्या जागा भरण्यासाठी महाविकासआघाडीच्या गोटात हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये विधानपरिषदेवर स्वत:ची वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरु झाली होती. यापैकी काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशीत विधान परिषदेची उमेदवारी सचिन सावंत यांची निवड झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय, मुजफ्फर हुसेन, रजनी पाटील आणि अनिरुद्ध वनकर यांनाही काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप काँग्रेसकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी कधी पाठवणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यपालनियुक्त सदस्यासाठी काय असतात निकष?
महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या आहेत. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. राजकीयदृष्ट्या सोय पाहता अनेकदा हे निकष बाजूला ठेवले जातात. मात्र, कधी कधी राज्यपाल हे निकष पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीवेळी महाविकासआघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात संघर्ष झालेला पाहायला मिळाला होता. सध्याच्या १२ जागाही जून महिन्यात भरल्या जाणे अपेक्षित होते. मात्र, राज्यपालांनी कोरोना परिस्थितीचे कारण देत या नियुक्त्या पुढे ढकलल्या होत्या. परंतु, यावेळी महाविकासआघाडीने १२ जागा भरायच्याच, असा चंग बांधला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्याला नकार दिल्यास पुन्हा एकदा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?
Anand Shinde | राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’, गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?
(Mahavikas Aghadi govt pass resolution in cabinet meeting about Governor appointed MLC )