6 जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान, कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 27, 2021 | 7:39 PM

आपत्तीग्रस्तांना मदत करत असताना कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज असल्याचं महत्त्वाचं भाष्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं.

6 जिल्ह्यांचं प्रचंड नुकसान, कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज : विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us on

मुंबई : अतिवृष्टीमुळे कोकण पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांचं अतोनात नुकसान झालंय. घरंच्या घरं वाहून गेलीत… मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय… तर दुसरीकडे निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातही अक्रित घडलं. आपत्तीग्रस्तांना मदत करत असताना कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज असल्याचं महत्त्वाचं भाष्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं. वारंवार घडणार्‍या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरुपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरु आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज

कोकण हा इको सेंसेटीव्ह झोन जाहीर करण्याची शिफारस गाडगीळ समितीने केली आहे. त्यामुळे नैसर्गिक वैभवाला छेडछाड केली तर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कटू निर्णय घेण्याची गरज मला तरी वाटते, असं वडेट्टीवार म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापन केंद्र बळकट करण्याबाबत विचार सुरु

एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम वेळेवर पोहचल्या नाहीत अशा तक्रारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरुपी टीम तैनात केल्या पाहिजेत, असा विचार आहे. जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्र बळकट करणे, याबद्दलही विचार सुरु आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांबरोबर कोणत्या विषयांवर चर्चा?

आता नुकसानग्रस्तांना काय मदत करता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहोत. शेतीचं नुकसान झालं आहे, रस्ते, वीजेचं नुकसान झालंय, या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावं, पूर रेषेत असलेले गावं यांचं पुनर्वसन करणं याबाबतही चर्चा होणार आहे.

अगोदर अजितदादांशी चर्चा नंतर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

या सगळ्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आधी बैठक होणार आहे, नंतर मुख्यमंत्र्यांबरोबर संध्याकाळी चर्चा होणार आहे. या सगळ्यांबद्दल आज चर्चा होऊन उद्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत याला मान्यता दिली जाईल. रस्त्याला 1600 ते 1700 कोटी, वीजेचे नुकसान झालंय त्याला ५०० कोटी खर्च येण्याची शक्यता आहे, अशी माहितीही विजय वडेट्टीवार यांनी दिली.

शासन कोणकोणते निर्णय घेऊ शकतो?

ज्या गावाचं पुनर्वसन करायचं ती घरं म्हाडाने बांधावी आणि तिथल्या नागरी सुविधा शासन देईल असा विचार आहे. तीन टप्प्यात यांचं पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे. दरडी खालील गावं शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत
सौम्य धोकादायक गावं कोणती? तसंच कायम पूर येतो अशा गावाचा शोध घेऊन त्यांचं पुनर्वसन करणं असं तीन टप्प्यात हे काम करायचं आहे, असं वडेट्टीवारांनी सांगितलं.

(Huge loss of 6 districts, need for Couragious decision for Konkan Says Maharashtra Minister Vijay Wadettiwar)

हे ही वाचा :

दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज; पॅकेजसाठी हालचाली सुरू

ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा; शरद पवारांचं आवाहन

पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, दोन दिवसात मदत पोहोचेल: शरद पवार