कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक, महाविकास आघाडी एकत्र, भाजप सत्ता गमावणार?

| Updated on: Jan 02, 2020 | 11:40 AM

कोल्हापूर जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (Kolhapur ZP president election) निवड होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडीने एकत्र येऊन भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक, महाविकास आघाडी एकत्र, भाजप सत्ता गमावणार?
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (Kolhapur ZP president election) निवड होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडीने एकत्र येऊन भाजपची सत्ता उलथवून लावण्याचा चंग बांधला आहे. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Kolhapur ZP president election)

कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य पोलीस बंदोबस्तात बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने निघाले. कर्नाटक सरकारच्या बसमधून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला. राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानंतर आता अडीच वर्षे विरोधात राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या साथीने सत्ता काबीज करण्याची तयारी सुरू केली. तर दुसऱ्या बाजूला भाजपने स्थानिक आघाड्यांना एकत्र करत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपला जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता टिकवणे प्रतिष्ठेचे बनले आहे. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. तर दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही शिवसेनेला सोबत घेण्याची रणनीती आखली. त्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी प्रदेश पातळीवरून प्रयत्न सुरू केले. त्यामुळे एक तारखेला आम्ही बहुमताच्या पुढे असू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

कधीकाळी एखादा जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाजपला अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तब्बल 14 जागा मिळाल्या. काँग्रेसलाही या निवडणुकीत 14 जागा मिळाल्या असल्या तरी राष्ट्रवादी बरोबरच स्थानिक आघाड्यांना एकत्र घेण्यात काँग्रेस मागे पडली आणि इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच  इतर स्थानिक आघाड्यांना बरोबर घेऊन भाजपने 34 आकडा गाठून आपलं बहुमत सिद्ध केलं आणि अध्यक्षपदाची माळ भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांच्या गळ्यात पडली.

2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

  • भाजप 14,
  • काँग्रेस,14,
  • राष्ट्रवादी 11,
  • शिवसेना 10,
  • जनसुराज्य 6,
  • इतर स्थानिक आघाड्या आणि अपक्ष 11

यातील काँग्रेस राष्ट्रवादी वगळता इतर  स्थानिक आघाड्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. ज्यामध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश होता.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणे भाजपसाठी अडचणीचं बनलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अवघ्या दीड वर्षात स्वाभिमानीने भाजपविरोधात भूमिका घेतली, तर विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनाही भाजप विरोधात आहे. याशिवाय भाजपनं शब्द पाळला नसल्याने स्थानिक आघाड्यांमध्ये ही अस्वस्थता आहे. स्वाभिमानी भाजपविरोधातच असेल असं सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

दहा सदस्य असलेली शिवसेना या सत्तेच्या तिढ्यामुळे किंगमेकर बनली आहे. जिल्हा परिषदेवर सत्तांतर अटळ आहे, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे.