काँग्रेस आणि शरद पवार गटाला किती जागा मिळणार?; शरद पवार यांनी सांगितलेला अंदाज काय?
संकटकाळात उद्धव ठाकरेंना मदत करणारा पहिला माणूस मी असेन, असे मोदी म्हणाले. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख म्हटलं असेल, पण मोदींची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर कधीच येऊ नये असं शरद पवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासा आघाडीच्या नेत्यांचे प्रचार दौर वेगात सुरू असून राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या जळगावमध्ये आहेत. तेथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. तसेच आगामी निवडणुकीत मविआ सरकारला राज्यात किती जागा मिळतील याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. गेल्या वेळचं चित्र आणि आताचे चित्र वेगळं आहे, त्यात जमीन आसमानचा फरक आहे असे शरद पवार यांनी नमूद केले. (राज्यात) काँग्रेस ला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला आठ ते नऊ सुध्दां मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
काय म्हणाले शरद पवार ?
सध्या माझे लक्ष दहा जागांवर आहे, मात्र यावेळी बदल अनुकूल दिसतो आहे. काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला आठ ते नऊ सुध्दां मिळू शकतात. गेल्या वेळचं चित्र आणि आताचे चित्र वेगळं आहे, दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे.
तर भाजपच्या 400 पार आकड्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता त्यांनी 400 चा आकडा आणखी खाली आणला आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक होतील त्यावेळेस त्यांचा आकडा हा आणखी खाली आलेला दिसेल, असं शरद पवार म्हणाले.
मोदींच्या निर्णयावर केली टीका
सध्या परिस्थिती वेगाने बदलते आहे. लोकांमध्ये मोदींविषयी जी आस्था होती ती आता कमी होत आहे. मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या, मात्र प्रत्यक्ष कृती झालीच नाही. सरकारची परिस्थिती आहे की नाही हे न बघता ते थेट कुठल्याही निर्णयाबद्दल बोलतात, अशी टीका शरद पवार यांनी केली. मनमोहन सिंह यांनी जे निर्णय घेतले होते. त्यावर मोदींनी टीका केली, पण आता तेच निर्णय मोदी स्वतः घेत आहेत, हा विरोधाभास लोकांना दिसतो आहे. त्च्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विषयी लोकांमध्ये नाराजी आहे. मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि नरेंद्र मोदी यांची दहा वर्ष याची तुलना जर केली तर मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले ते कुठलाही गाजावाजा न करता घेतले. किंवा त्यांनी केलेल्या कृतीचा, निर्णयांचीही गवगवा केला नाही, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
उद्धव ठाकरेंवर ती वेळ कधीही येऊ नये
टीव्ही9 दिलेल्या महामुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केले होते. त्यांच्या संकटकाळात मदत करणारा पहिला माणूस मी असेन, असे मोदी म्हणाले. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख म्हटलं असेल, पण मोदींची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर कधीच येऊ नये असं शरद पवार म्हणाले.