अमरावतीचा आढावा : विधानसभेला अमरावतीकरांचा कौल कुणाला?

14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी,  धामणगाव यांचा समावेश आहे.  

अमरावतीचा आढावा : विधानसभेला अमरावतीकरांचा कौल कुणाला?
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 6:21 PM

Amravati Vidhansabha अमरावती : 14 तालुक्यांच्या अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट मोर्शी,  धामणगाव यांचा समावेश आहे.  नुकत्याच झालेल्या  लोकसभा निवडणुकीत आघाडी समर्थक उमेदवार नवनीत राणा यांनी विजय मिळवला. त्यामुळे एकाच घरात आमदार आणि खासदार असं चित्र अमरावतीत आहे.  या दोघांची ताकद येत्या विधानसभा निवडणुकीत कुठले राजकीय समीकरण घडवून आणेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

खासदार नवनीत राणा त्यांचा अधिवेशनात अमरावतीच्या विकासावर आवाज उठवत आहेत. हा आवाज अमरावती जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीचे  राजकीय समीकरण बदलवू शकतो.

अमरावती जिल्ह्यात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा असल्या, तरी मेळघाट आदिवासी भागात आदिवासींना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. याच मेळघाटातील आदिवासी भागात कुपोषणामुळे शेकडो बालकांचा मृत्यू होतो. या कुपोषणामुळे दुर्दैवाने अमरावतीची तेवढीच ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात शेती आणि शेतमजुरी हेच रोजगार मिळविण्याचे साधन आहे. बेरोजगारांना काम मिळेल असे कुठलेच मोठे कारखाने अमरावतीत नाहीत.

जिल्ह्यात अचलपूर, मोर्शी, चांदूर बाजार, वरुड, या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. मात्र संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे संत्रा उत्पादकांना बाहेरील राज्यातील बाजारपेठांवर आणि व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लगते.

दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे व्यापारी संत्र्याला भाव मिळू देत नहीत.आता कृषी मंत्री अमरावतीचे असल्याने कृषी मंत्री अनिल बोंडे नेमकं काय करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

अमरावतीत सुसज्ज रेल्वे स्थानक उभारले गेले, पाच एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ा सुरू झाल्या. रेंगाळलेले नरखेड रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळू शकेल. नागपूर इंटरसिटीची वेळ बदलणे, नरखेड मार्गावर गाड्या सुरू करणे असा प्रवास आहे.

अचलपूर, अंजनगाव, वरुड आणि मोर्शी या कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. मात्र संत्र्यावर प्रक्रिया करणारे कुठलेच उद्योग नाहीत, कोल्ड स्टोरेज नाहीत. किंवा आपला संत्रा विदेशात थेट विकण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तयार झालेला संत्रा ठराविक वेळेत तोडून बाजार पेठेत पोहचवावा लागतो दुसरा पर्याय नसल्यामुळे व्यापारी मागतील त्या भावात आपला संत्रा विकावा  लागतो.

1) बडनेरा विधानसभा मतदारसंघ

बडनेरा मतदारसंघात सध्या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा  नेतृत्त्व करतात. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी विजय मिळवल्याने एकाच घरात आमदार आणि खासदार झाले आहेत. रवी राणा 2014 मध्ये बडनेरा येथून दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी या मतदारसंघातून शिवसेना-भाजपा इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विजयामुळे आता आमदार रवी राणा हे वेगळ्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करीत असल्याची चर्चा आहे. विधानसभेचे राजकारण अधिकच तापले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शहा देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रवी राणा यांनी घेतलेली भेट, या मतदारसंघात भाजप सेनेच्या इच्छुक उमेदवारांना बुचकळ्यात टाकणारी आहे.

दुसरीकडे सेना-भाजपा देखील इच्छुकांची गर्दी बरीच आहे. ते देखील हायकमांडच्या संपर्कात मुंबई-दिल्लीच्या वारीत गुंतले आहेत. मात्र युती झाल्यास हा मतदारसंघ सेनेकडे राहण्याची अधिक चर्चा आहे. भाजपातील इच्छुक मात्र हा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

सेनेचे दिवंगत माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांनी या मतदारसंघातून लढावे अशी शिवसेनेच्या एका गटाचा सूर आहे. शिवसेनेकडून प्रशांत वानखडे, सुनील खराटे, ज्ञानेश्वर धाने पाटील, तर भाजपकडून तुषार भारतीय, नितीन धांडे, शिवराय कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. माजी महापौर विलास इंगोले हेदेखील लढण्यात इच्छुक असून त्यांचा पक्ष अद्याप निश्चित झालेला नाही. आमदार रवी राणा यांची खेळी काय असेल, शिवसेनेकडून मतदारसंघ खेचण्याचे काही भाजपचे प्रयत्न यशस्वी होतील का, सेना मतदारसंघ कायम ठेवणार का, अशा विविध प्रश्नांनी राजकीय चर्चेला जोर धरला आहे.

2) मेळघाट विधानसभा मतदारसंघ (Melghat Vidhansabha)

मेळघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रभूदास भिलावेकर विद्यमान आमदार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आल्याने मेळघाट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास अनेक जण बाशिंग बांधून तयार आहेत.

चर्चेतील उमेदवारांची दावेदारी निश्चित मानली जात असली तरी ते कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवतील हे निश्चित नाही. गतवेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत झाली होती. काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यंदा तीनही आजी माजी आमदार निवडणुकीसाठी सज्ज असले तरी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयावर उमेदवारांची मदार असेल.

विद्यमान भाजप आमदारासमोर पक्षातीलच अनेकांनी आव्हान उभे केले आहे. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा असे तीनही प्रमुख पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी नवखे सरसावले आहेत. मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

2014 मध्ये राजकुमार पटेल यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवली. भाजपच्या नवख्या प्रभुदास भिलावेकर यांनी दोन हजार मतांनी त्यांचा पराभव केला. केवलराम काळे, दयाराम काळे, राजकुमार पटेल, प्रभुदास भिलावेकर, हिरालाल मावस्‍कर, युवा स्वाभिमान, वंचित आघाडी, बसपा यांचे उमेदवार याठिकाणी  असण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात आदिवासींची सुमारे 80 हजार मते निर्णायक आहेत. 1962 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता 1967 पासून हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. विद्यमान आमदार भिलावेकर यांच्यासह भाजपमधून अनेकांचे डोळे आमदारकीकडे लागले आहेत.

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास दोन माजी आमदार उमेदवारांसाठी तयारीत आहेत.  2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढून दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले माजी आमदार राजकुमार पटेल हे तयारीत आहे. मात्र अद्याप त्यांचा पक्ष ठरला नाही. आघाडीत बिघाडी झाल्यास आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास काँग्रेसचे प्रमुख दावेदार भाजपकडे जाण्याचा पवित्रा घेऊ शकतात. भाजप यावेळी नवा चेहरा देण्याची शक्यता या मतदारसंघात आहे.

3) वरुड मोर्शी विधानसभा (Warud morshi Vidhansabha)

कृषीमंत्री अनिल बोंडे हे वरुड मोर्शी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. दोन तपानंतर यंदा यामतदारसंघात कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने, आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान आमदार अनिल बोंडे हे मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. 2009 मध्ये ते अपक्ष म्हणून विधानसभेत पोहोचले होते, तर 2014 मध्ये भाजपकडून.

चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मोशी मतदारसंघातील लढत ही राज्याचे कृषिमंत्री विरुद्ध इतर उमेदवार अशी होणार आहे.  गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख यांचा 40  हजार मतांनी पराभव केला. तर त्यापूर्वी 2009 च्या निवडणुकीत अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे उमेदवार नरेशचंद्र ठाकरे यांना रोखले होते. यंदाही या मतदारसंघात पारंपारिक लढत होण्याची शक्यता आहे.

तीनदा आमदारकी भूषविणारे हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास येथे राष्ट्रवादी काँग्रेस हक्क सांगू शकते. शिवसेना-भाजप युती झाल्यास विद्यमान आमदारांच्या दावा बळकट असेल. मात्र भाजप मधूनही विजय श्रीराव , गोपाल मालपे यांची नावे केवळ चर्चेत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला लोकसभेत कमी मतं मिळाली होती. शिवाय बहुजन समाज पार्टी, आमदार बच्चू कडू प्रणित  प्रहार पक्ष आणि खासदार नवनीत राणा यांचा युवा स्वभिमान पक्ष आदींचे उमेदवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत असतील.

लोकसभा आकडेवारीनुसार एकूण मतदार संख्या 2 लाख ८७ हजार ५७९ इतकी आहे. त्यात एक लाख ४८ हजार ६०८ पुरुष व १ लाख 38 हजार ९७० महिला तर एक तृतीयपंथी मतदार आहेत.

4) दर्यापूर विधानसभा (Daryapur Vidhansabha)

दर्यापूर विधानसभेत भाजपचे रमेश बुंदिले विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांनी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पण मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या निवडणुकीतही इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी असल्याचे संकेत आहेत. 2009 मध्ये मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.  2009च्या निवडणुकीत शिवसेना नेते आणि तत्कालिन खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुलगा अभिजित अडसूळ यांना तिकीट देऊन निवडून आणलं.  2014 मध्ये राजकीय परिस्थिती बदलली सेना-भाजप स्वतंत्रपणे लढले त्यात भाजप उमेदवार रमेश बुंदिले निवडून आले. आता त्यांनी दुसऱ्यांदा कंबर कसली आहे.

पूर्वीचा शिवसेनेचा हा बालेकिल्ला सध्य स्थितीत भाजपच्या ताब्यात असला तरी या मतदारसंघातील दावा शिवसेनेनेही सोडला नाही. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांचा एक गट मातोश्रीवर जाऊन आल्याची चर्चा आहे.

विद्यमान आमदार भाजपचे असताना त्यांच्या व्यतिरिक्त काही नावांची पक्षात चर्चा सुरू आहे. भाजप  उमेदवारीचा दावा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांनीही आता आपला मोर्चा दर्यापूर मतदारसंघाकडे वळविला आहे. गेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या उमेदवारीसाठी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारे जिल्हा परिषदचे विद्यमान आरोग्य सभापती बळवंत वानखडे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. ते काँग्रेसकडून लढतात की रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी मिळवतात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काँग्रेसकडून वसंतराव पुरके यांचे निकटवर्तीय असलेले सुधाकर तलवारे हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.  मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी कायम राहिल्यास बळवंत वानखडे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी हा मतदारसंघ त्यांच्या वडिलांसाठी पिंजून काढला. त्यामुळे शिवसेनेतून त्यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार या मतदारसंघात दोन लाख 94 हजार 762 मतदार आहेत. यामध्ये एक लाख 53 हजार 622 पुरुष 1 लाख 41 हजार 238 महिला मतदारांचा समावेश आहे.

5) तिवसा विधानसभा मतदारसंघ 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. तिवसा मतदारसंघात सध्या नवख्या उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. महायुती- आघाडीची समीकरणे कशी जुळतात यावरच काही गोष्टी अवलंबून आहेत. तरी काँग्रेसच्या गोटात उमेदवारी निश्चित झाली आहे. याउलट स्थिती सेना-भाजपमध्ये आहे. हा  मतदारसंघ कुणाला हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे  राजकीयदृष्ट्या या मतदारसंघाला महत्त्वाचे स्थान आहे.

तिवसा मतदारसंघात मागील दहा वर्षात  काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांचा एक छत्री अंमल राहिला आहे. याच मतदारसंघातून भाजपने आपल्या महाजानदेश यात्रेला सुरुवात केली. या महाजनादेश यात्रेचा नेमका यशोमती ठाकूर यांच्यावर काय परिणाम होतो, हे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात स्पष्ट होईल.

यावेळीदेखील यशोमती ठाकूर यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित आहे. यीउलट स्थिती सेना-भाजपमध्ये आहे. 2014 मध्ये निवडणुकीत आघाडी फिस्कटल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना चारही पक्ष स्वत्रंत लढले. इथे यशोमती ठाकूर यांचा विजय झाला.  गेल्या निवडणुकीत भाजप सेनेची मतदानाची टक्केवारी ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या टक्केवारी पेक्षा जास्त आहे.

त्यामुळे या निवडणुकीत युती झाल्यास यशोमती ठाकूर यांना प्रचंड संघर्ष करावा लागणार असे चित्र दिसत आहे. तिवसा  मतदारसंघात यशोमती ठाकूर सलग दोनदा निवडून आल्या आहेत. आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील दिवंगत भैय्यासाहेब ठाकूर यांनी सलग दोन वेळा तिवसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

6) अचलपूर विधानसभा मतदारसंघ 

आमदार बच्चू कडूंचा हा मतदारसंघ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत करता अचलपूर मतदारसंघ भाजपकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे  तर रिपाईचे सर्वेसर्वा  राजेंद्र गवई याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेसकडून त्यांची  उमेदवार चर्चित आहेत. तर शिवसेना प्रतीक्षेत आहे. भाजप सेना युतीत अचलपूर शिवसेनेला मिळण्याची आशा आहे.

दरम्यान इच्छुकांच्या  भाऊगर्दी होत असल्याने हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येतो यानंतर पुढे ठरवू  असा सबुरीचा सल्ला भाजप पक्षश्रेष्ठी देत आहेत. मतदारसंघात भाजपकडून नेहमीच माळी समाजाला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने दिवंगत माजी राज्यमंत्री विनायकराव कोरडे यांचे चिरंजीव प्रमोद कोरडे तर  मागील पराभूत उमेदवार अशोक बनसोडे यांचे नावे पुढे येत आहे.

काँग्रेसकडून बबलू देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरेखा ठाकरे, माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख,  संगीता ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. रिपाई तर्फे खुद्द डॉक्टर राजेंद्र आग्रही आहेत. तर लोकसभा निवडणुकीत बसपाकडून दारुण पराभूत उमेदवार प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा छंद जोपासून असलेले अचलपूरचे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे त्यांचे नाव मागे नाही.

अचलपूर विधानसभा संघाचे मागील तीन निवडणूक पासून प्रहारचे सर्वेसर्व आमदार बच्चू कडू प्रतिनिधित्व करत आहेत. ते 2019 ची निवडणूक प्रहारकडून  लढणार आहेत. तर इतर राजकीय पक्ष कुणाला उमेदवारी देतात यावर इथला निकाल अवलंबून आहे.  दुसरीकडे विद्यमान आमदार बच्चू कडू हे शिवसेनेसोबत जाणार  असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

7) अमरावती विधानसभा मतदारसंघ

अमरावती मतदारसंघात भाजपचे सुनील देशमुख हे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना सर्व विधानसभांमध्ये आघाडी मिळाली. अमरावती विधानसभा मतदारसंघातही 27 हजार 668 मतांची आघाडी त्यांना प्राप्त झाली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा युतीसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. काँग्रेसने 2009 मध्ये सुनील देशमुख राज्यमंत्री असताना त्यांना थांबायला सांगून तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र असलेले रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शहराच्या राजकारणात एक वेगळीच कलाटणी मिळाली. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत राष्ट्रपतीपुत्राने  पाच हजार 614 मतांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी अपक्ष राहिलेल्या सुनील देशमुख यांनी नंतर चौदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.  आता सुनील देशमुख यांच्यासमोर कोण आव्हान उभं करतं हे पाहावं लागेल.

8) धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ

धामणगाव रेल्वे मतदारसंघात मागील तीन टर्म  काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप हे प्रतिनिधित्व करत आहेत. 2014 च्या  विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धामणगाव रेल्वे मतदारसंघातील चांदूर येथे भाजपचे उमेदवार अरुण अडसळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली. तरीही अडसळ यांचा  984 मतांनी पराभव करीत आमदार वीरेंद्र जगताप यांनी  हॅट्ट्रिक साधली.  आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत  बहुदा भाजप  उमेदवार बदलला जाणार आहे.  काँग्रेसकडून जगताप ते पुन्हा निवडणूक लढवतील.

अरुण अडसळ यांना विधान परिषदेचे सदस्य मिळाल्यामुळे भाजपकडून त्यांचे सुपुत्र तथा धामणगावचे  नगराध्यक्ष प्रताप अडसळ  यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे हेदेखील भाजपकडून स्पर्धेत आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य आणि धामणगाव बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक नितीन निस्ताने यांनी देखील जनसंपर्क वाढवला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी आतापर्यंत दोन वेळा मतदारसंघ फिरुन काढल्याची माहिती आहे. चांदूर रेल्वे येथील जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष निलेश विश्‍वकर्मा यांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केले आहे.

अमरावती जिल्हयात एकूण 8 जागा 

अमरावती , बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा , मेळघाट  मोर्शी,  धामणगाव , असे आठ  विधानसभा आहेत

६ जागा भाजपकडे

२ जागा काँग्रेसकडे

२ जागेवर अपक्ष आमदार

अमरावती जिल्हयातील विद्यमान आमदार

अमरावती     : आमदार सुनील देशमुख (भाजप )

बडनेरा         :  आमदार रवी राणा  (युवा स्वाभिमान पार्टी )

दर्यापूर         :  आमदार (भाजप )

अचलपूर      :  आमदार  (प्रहार पार्टी)

तिवसा         :  आमदार (काँग्रेस )

मेळघाट       :  आमदार(भाजप )

मोर्शी         :  आमदार (भाजप )

धामणगाव  :  आमदार  काँग्रेस )

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....