अशोक चव्हाण यांचं बेरजेचं राजकारण, वंचितच्या नेत्याचा काँग्रेस प्रवेश

| Updated on: Jan 24, 2021 | 1:53 PM

वंचितचे महत्त्वाचे नेते राहिलेले मारोती कवळे गुरुजी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे.

अशोक चव्हाण यांचं बेरजेचं राजकारण, वंचितच्या नेत्याचा काँग्रेस प्रवेश
Follow us on

नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले मारोती कवळे गुरुजी आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उमरी तालुक्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळख असलेल्या कवळे गुरुजींचा आज मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश होणार आहे. कवळे गुरुजींच्या काँग्रेस प्रवेशाने नायगांव विधानसभा मतदारसंघातील चित्रच बदलणार आहे.  (Maroti Kawale Guruji Will join Conggress in Presence of Ashok Chavan)

कवळे गुरुजी या नावाने जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले मारोती कवळे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. पतपेढीच्या माध्यमांतून कवळे गुरुजींनी हजारो शेतकऱ्यांना आर्थिक हाथभर लावत पायावर उभे केलंय. दूध, गुळाच्या व्यवसायात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना आपल्याशी जोडलेल आहे. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे कट्टर समर्थक असलेले कवळे गुरुजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खास मर्जीतील नेते म्हणून देखील कवळे गुरुजींची ओळख आहे. मात्र गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीत उडी मारली आणि नायगाव विधानसभा लढवली. या निवडणुकीत त्यांनी भरघोस मते घेतली मात्र इथून भाजपचा उमेदवार विजयी झाला. या अपयशा नंतर कवळे गुरुजी गेली वर्षभर राजकारनापासून काहीसे अलिप्त राहिले.

काही दिवसांपूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांचा वाघलवाडा इथला साखर कारखाना कवळे उद्योग समूहाने विकत घेतला. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, आणि त्याच वेळी कवळे गुरुजींची राजकीय दिशा स्पष्ट झाली. कवळे गुरुजी आज अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उमरी इथे हजारो समर्थकांच्या साक्षीने कवळे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नेते या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.

चव्हाण यांचे राजकीय गणित

नायगांव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे. त्यामुळे नायगांव विधानसभा मतदारसंघात रिक्त होणारी पोकळी कवळे गुरुजींच्या माध्यमातून भरल्या जाणार आहे. एक चारित्र्यसंपन्न , मितभाषी आणि मदतीसाठी धावणारा नेता अशी कवळे गुरुजींची ओळख आहे.

त्यांच्या या चांगल्या प्रतिमेमुळे नायगांव विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस त्यांना संधी देऊ शकते. नांदेड लोकसभेत पराभव झाल्या नंतर अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात बेरजेचे राजकारण सुरू केलंय. चांगल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी चव्हाण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कवळे गुरुजींचा राजकीय प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र बदलणारा ठरणार आहे.

यशपाल भिंगे यांनीही सोडली होती वंचितची साथ

यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध लढवली होती. त्यावेळी त्यांनी लाखांच्या वर मतं घेऊन अशोक चव्हाण यांना घाम फोडला. त्यांच्यामुळेच अशोक चव्हणांचा पराभव झाल्याचं बोललं जातं. त्यांनी लोकसभेनंतर एका वर्षांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं साहित्य क्षेत्रातून विधानपरिषदेवर जाण्याची संधी दिली आहे.

(Maroti Kawale Guruji Will join Conggress in Presence of Ashok Chavan)

हे ही वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित