‘संजय राऊतांची बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी’, पडळकरांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 15, 2020 | 12:33 PM

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पडळकर यांनी खास धनगरी पेहराव करत ढोल वाजवून आंदोलन केलं होतं. त्यावरुन सामनाच्या अग्रलेखात पडळकरांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

संजय राऊतांची बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, पडळकरांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई: सामनाच्या अग्रलेखात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकुचंद पडळकर असा करण्यात आला आहे. त्यावरुन पडळकर यांनी शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा घणाघाती आरोप पडळकर यांनी केला आहे. (Gopichand Padalkar on Sanjay Raut and Samaana editorial)

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पडळकर यांनी खास धनगरी पेहराव करत ढोल वाजवून आंदोलन केलं होतं. त्यावरुन सामनाच्या अग्रलेखात पडळकरांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. त्याबाबत विचारलं असता पडळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सामना वृत्तपत्र आपण वाचत नाही. हा सामना आता जुना सामना राहिला नाही तर व्यापारी सामना झाला आहे. बाळासाहेबांच्या काळातील सामना वेगळा होता, अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर जोरदार टीका केलीय.

‘सामना’तून पडळकरांवर जोरदार निशाणा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फेकूचंद पडळकरांसारखे नेते विधानसभेच्या दारात पारंपरिक ढोल वाजवून सरकारविरोधात नाचगाणे, घोषणाबाजी करीत होते. त्या ढोलवादनाचे थेट प्रसारण सर्व वृत्तवाहिन्या दाखवत होत्या. हुकूमशाही किंवा आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकलं असतं, पण फेकूचंदना लोकशाही मार्गानं ढओल वाजवून निषेध करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं, अशी फेकूचंद यांची मागणी होती. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण हे संवेदनशील विषय आहेत. कुणावरही अन्याय न होता आरक्षण मिळावे, ही शासनाही भूमिका आहेच.

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय- पडळकर

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारमधीलच काही नेते पिवळा फेटा, खांद्यावर घोंगडी, हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते. मग आता तेच नेते गप्प का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी जे आदिवासींना तेच धनगरांना दिलं होतं. धनगरांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. पण त्यातील एक रुपयाही महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही. यशवंत महामेश योजनाही राज्य सरकारनं रद्द केली. हे सरकार धनगर, भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोपही पडळकरांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केला होता.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

‘…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असते’ शिवसेनेचा घणाघात

Gopichand Padalkar on Sanjay Raut and Samaana editorial