गणेश नाईकांसह 15 नगरसेवक भाजप सोडण्याची चर्चा, जिल्हाध्यक्ष म्हणतात आम्ही ‘फेव्हिकॉल’ने जोडलो
आमचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही. 'फेव्हिकॉल'च्या जोडप्रमाणे सगळे मजबूत एकत्र आहेत, असं नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष सध्या जोरदार तयारी करत आहेत. नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या गणेश नाईक यांच्यासोबत 15 नगरसेवक पक्ष सोडणार (Navi Mumbai Ganesh Naik) असल्याची चर्चा आहे. मात्र भाजप जिल्हाध्यक्षांनी या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.
‘आमचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही. ‘फेव्हिकॉल’च्या जोडप्रमाणे सगळे मजबूत एकत्र आहेत. सर्व नगरसेवक भाजपसोबत आहेत. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे काही पदाधिकारी पब्लिसिटीसाठी अशी कामं करतात’, असा दावा नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. त्यांच्याकडूनच या बातम्या येतात. महाविकास आघाडीतील 10-15 जण आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या पक्षातील लोक फुटू नयेत, म्हणून अशा बातम्या दिल्या जातात, असा दावाही घरत यांनी केला.
काही दिवसांपूर्वी 10 ते 15 नगरसेवकांसोबत आमची बैठक झाली. या बैठकीला गणेश नाईक उपस्थित होते. त्यासोबतच भाजपचे काही वरिष्ठ नेतेही हजर होते. पक्षात पडलेल्या फुटीमुळे अशा बातम्या येत आहेत. योग्य वेळी कोण कुठे जाणार, हे समजेल, असंही घरत म्हणाले.
दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे नवी मुंबई प्रभारी निरीक्षक आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांच्या प्रभाग बैठका घेऊन पक्ष वाढवण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या तीन ते चार वेळा बैठका घेण्यात आल्या.
या बैठकांचा अहवाल 4 फेब्रुवारी रोजी वाशीत महाविकास आघाडीतर्फे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये सादर करण्यात येणार आहे. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. (Navi Mumbai Ganesh Naik)