पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी, निवृत्त अधिकारी नियुक्तीवरही राज्यपाल कायदेशीर सल्ला घेतील – नवाब मलिक
आता पुन्हा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल सर्वच विषयांवर कायदेशीर सल्ला घेत असतात त्याचप्रमाणे निवृत्त अधिकारी खाजगी सचिव नेमणूक याविषयावरसुध्दा कायदेशीर सल्ला घेतील असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : जेव्हापासून राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झालं आहे तेव्हापासून राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshyari) विरुद्ध महाविकास आघाडी वाद अनेकदा पाहिला आहे. आता पुन्हा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल सर्वच विषयांवर कायदेशीर सल्ला घेत असतात त्याचप्रमाणे निवृत्त अधिकारी खाजगी सचिव नेमणूक याविषयावरसुध्दा कायदेशीर सल्ला घेतील असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. राजभवनात निवृत्त अधिकाऱ्याला नियमित पदावर नियुक्त करण्यात आलेल्या विषयावर माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता नवाब मलिक यांनी राजभवनातील नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निवृत्त अधिकार्याला जे नियमित पद आहे त्याच्यावर नियुक्त करता येत नाही. मात्र राजभवनातून तसे आदेश निर्गमित झाले आहेत. हजारोंच्या संख्येने सनदी अधिकारी या राज्यात काम करतात. त्यातील एखादा अधिकारी निवडण्याचा अधिकार राजभवनाला आहे. निवृत्त अधिकाऱ्याला त्या पदावर नियुक्त करणे हे अनियमित कामकाज आहे. हा नियमांचा भंग आहे. राजभवनातून नियमांचा भंग होणे हे अपेक्षित नाही असेही नवाब मलिक म्हणाले.
राजभवनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कुठल्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही ही जबाबदारी असते किंवा त्यांनी नियम भंग होणार नाही याची खात्री केली पाहिजे. मात्र एखादा अधिकारी निवृत्त झाला तरी त्याच्यासाठी इतका मोह कशाला ? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. जसे कायदेशीर सल्ले राज्यपाल घेतात त्याप्रमाणे याविषयी सल्ला घेतील व त्या निवृत्त अधिकाऱ्याला रिलीफ करतील अशी अपेक्षाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत स्वबळावर लढण्यासाठी राष्ट्रवादीची चाचपणी
आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई जिल्हाध्यक्ष व प्रभारी आणि नगरसेवकांची बैठक नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुंबई महानगरपालिकेची फेररचना झाल्यानंतर आज ही बैठक झाली. या बैठकीला सहा जिल्हाध्यक्ष, प्रभारी आणि सहा नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत फेररचना झाल्यानंतर जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांच्या वार्डाची परिस्थिती काय आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात कुठल्या – कुठल्या जागेवर स्वबळावर लढू शकतो याचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतर 14 फेब्रुवारीला विधानसभानिहाय बैठका घेऊन त्यामध्ये अंदाज घेतला जाईल व इतर पक्षांसोबत बोलणी करुन अंतिम निर्णय वरिष्ठ घेतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
