कोरोनाच्या दुसर्या लाटेला भाजप जबाबदार होताच, आता तिसर्या लाटेलाही कारणीभूत ठरणार: नवाब मलिक
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. (nawab malik)

मुंबई: भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याला भाजप कारणीभूत होता, ही सत्य परिस्थिती आहे, असं सांगतानाच आता तिसऱ्या लाटेलाही भाजपच जबाबदार ठरणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. (NCP Spokesperson Nawab Malik slams bjp over jan ashirwad yatra)
आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यातही राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमामुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होत आहे. राज्यसरकारने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होणार आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. निवडणूका येत – जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोरोना नियमांची ऐसीतैसी
दरम्यान, भाजपच्या चारही केंद्रीय मंत्र्यांनी राज्यभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रांना प्रचंड गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी लोक मास्क शिवाय यात्रेत सहभागी होत आहेत. या यात्रेतून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा स्फोट होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही रॅली काढून गर्दी जमवण्यास सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
बाळासाहेबांकडे आशीर्वाद मागितले
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या यात्रेची माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून जन आशीर्वादची संकल्पना आली. त्यांनी आम्हा सर्व मंत्र्यांना जनतेपर्यंत जाण्यास सांगितलं. लोकांचे आशीर्वाद घेण्यास सांगितलं. त्यामुळे कालपासून मी विमानतळापासून या यात्रेला सुरुवात केली. हुतात्मा चौकापर्यंत गेलो. लोकांनी, कार्यकर्त्यांनी आमचं स्वागत केलं. मध्ये आम्ही सावरकर स्मारक आणि शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचंही दर्शन घेतलं. साहेब, आशीर्वाद द्यायला तुम्ही आज हवे होतात. साहेब, आशीर्वाद द्या मला यशस्वी होऊ दे, एवढंच वाक्य म्हणालो. आणि पुढे ही यात्रा निघाली, असं राणे म्हणाले. (NCP Spokesperson Nawab Malik slams bjp over jan ashirwad yatra)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 August 2021 https://t.co/9l6lHBm7wF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2021
संबंधित बातम्या:
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृती स्थळावर नारायण राणेंनी काय आशीर्वाद मागितला?; राणेंनी केला मोठा खुलासा
बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पुत्र असतो तर त्यांना इथे येऊच दिलं नसतं; राणेंचा हल्लाबोल
(NCP Spokesperson Nawab Malik slams bjp over jan ashirwad yatra)