Nilesh Rane : पद वाटपातही ठाकरेंची घराणेशाही परंपरा कायम, तेजस ठाकरेच्या राजकीय एन्ट्रीवर निलेश राणेंचा ‘प्रहार’
शिवसेना पक्षात उभी फूट पडली असताना देखील पदाचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरता आलेला नाही. पक्षातील महत्वाच्या पदी कुटुंबियातीलच सदस्याची वर्णी लावायची ही परंपरा ठाकरे यांना कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांनी मात्र, आयुष्यभर खुर्च्या आणि टेबलच उचलायचे का? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण कोणत्याही वळणावर असो राणे आणि ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक ही ठरलेलीच आहे. आता आदित्य ठाकरे नंतर (Tejas Thackeray) तेजस ठाकरे हे पक्ष अडचणीत असताना राजकारणात एंन्ट्री करणार आहेत अशी चर्चा सुरुयं. ठाकरे कुटुंबातील आणखी कोणी राजकारणात येणार म्हणल्यावर यावर राणे कुटुंबियांकडून प्रतिक्रिया येणे हे साहजिकच आहे. त्यानुसार (Nilesh Rane) माजी खा. निलेश राणे यांनी तेजसच्या राजकीय एन्ट्रीवर खोचक टिका केली आहे. त्याला कोणताही राजकीय अनुभव नसताना थेट युवा सेनेची जबाबदारी दिली जात आहे. यापूर्वी तो जंगलात केवळ पाल, सरडे शोधत होता तो राजकारणात प्रवेश करतोय ही घराणेशाहीची परंपरा मात्र, त्यांनी कायम ठेवल्याची टिका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे तेजस ठाकरे हे राजकीय क्षेत्रात पदार्पन करणार म्हणल्यावर विरोधकांकडून आणखी काय टीका होणार हे पहावे लागणार आहे.
पक्ष सावरण्यासाठी आख्खं कुटुंब मैदानात
शिवसेना पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आख्खं ठाकरे कुटुंब मैदानात उतरले आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्या बैठका घेत असून आदित्य हे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या मतदार संघात दौरे करीत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून त्यांचे दौरे सुरु असून बंडखोर आमदारांवर ते सडकून टिका करीत आहे.हे सर्व सुरु असतानाच आता तेजस ठाकरे हे देखील राजकीय आखाड्यात उतरणार आहेत. त्याअनुशंगाने सर्वतोपरी तयारी करण्यात आली असून त्यांच्यावर युवा सेनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलेले जात आहे.
युवा सेनेची जबाबदारी तेजस ठाकरेंवर!
शिवसेनेतील बंडाळी वाढल्याने आता पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याासाठी आदित्य ठाकरे यांच्यावरील जाबाबदारीही वाढणार आहे. त्यांच्याकडे आता कार्यध्यक्ष पद सोपवले जाणार असल्याची चर्चा आहे तर तेजस ठाकरे यांच्यावर युवासेनेची जाबाबदारी येणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षात मोठे फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.
कार्यकर्त्यांनी काय करावे?
शिवसेना पक्षात उभी फूट पडली असताना देखील पदाचा मोह ठाकरे कुटुंबियांना आवरता आलेला नाही. पक्षातील महत्वाच्या पदी कुटुंबियातीलच सदस्याची वर्णी लावायची ही परंपरा ठाकरे यांना कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांनी मात्र, आयुष्यभर खुर्च्या आणि टेबलच उचलायचे का? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय काय करावे म्हणून तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करीत असल्याची टीका राणे यांनी केली आहे.