आता फोन उचलल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणा; काय आहे शासनाचा नवा जीआर?
शासनाकडून एक नवा जीआर काढण्यात आला आहे. नव्या जीआरनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना फोन उचलल्यानंतर हॅलोऐवजी वंदेमातरम् असं म्हणावं लागणार आहे.
मुंबई : शासनाकडून एक नवा जीआर (GR) काढण्यात आला आहे. नव्या जीआरनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना (Government employees)फोन उचलल्यानंतर हॅलोऐवजी वंदेमातरम् असं म्हणावं लागणार आहे. मात्र या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण वंदे मातरम् का म्हणतो तर देशाच्या प्रति असलेल्या आपल्या भक्तिचं ते एक प्रतिक आहे. त्यामुळे यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, आमच्या सत्राची जेव्हा सुरुवात होते, तेव्हा आम्ही वंदे मातरम् म्हणतो आणि सांगता राष्ट्रगीताने करतो असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
‘नागरिकांना समजून सांगावं लागेल’
पुढे बोलताना केसरकर यांनी म्हटलं आहे की, शासनाने आता हॅलोऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचा जीआर काढला आहे. याबाबात नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांना समजून सांगाव लागतं आणि आम्ही ते करू असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. वंदे मातरम् हे देशाच्या प्रति असलेल्या आपल्या भक्तिचं एक प्रतिक आहे. त्यामुळे यात चुकीचं असं काही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले?
दरम्यान यावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वंदे मातरम् म्हणण काय वाईट आहे, ज्या मातीत तुम्ही राहात त्या मातीला नमन करण म्हणजे वंदे मातरम् असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच देशा मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.