धरणात लघुशंकेची भाषा करणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार का? : पंकजा मुंडे

| Updated on: Aug 30, 2019 | 12:38 PM

धरणात लघुशंका करायची भाषा करणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी अजित पवारांना विचारला. तर धनंजय मुंडे लोकल नेते असल्याची टीकाही त्यांनी केली.

धरणात लघुशंकेची भाषा करणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार का? : पंकजा मुंडे
Follow us on

बीड : पुढच्या पाच वर्षात आम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहोत. धरणात लघुशंका करायची भाषा करणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार का, असा सवाल विचारत महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शरसंधान साधलं. परळीमधील वैजनाथ मंदिराच्या विकास कामाच्या उद्घाटनावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

‘कोटींची योजना मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आपण सगळ्यांनी बातम्या पाहिल्या आहेत. मी सांगते पाच वर्षात हा दुष्काळमुक्त होणार आहे मराठवाडा. आणि हे कोण करणार आहे? ज्यांनी धरणामध्ये लघुशंका करण्याची भाषा केली त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारी लोकं करणार आहेत? परळीच्या गटारी साफ करायला जमत नाहीत, हे धरणं साफ करणार आहेत’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.

या लोकांची लायकी नाही. लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्यांची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत. लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडतात आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात. प्रीतमला नॅशनल लेव्हलला, मला स्टेट लेव्हलला आणि यांना नगरपालिकेत निवडून दिलं, असं म्हणत पंकजा मुंडेंनी बंधू धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) चौफेर टीका केली.

ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्याला  विजयी करण्याचं भावनिक आवाहन केलं होतं.

“या भागाच्या लोकप्रतिनिधी, पालकमंत्री ग्रामविकास मंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री, ज्यांना दोन वेळा निवडून दिलं, एवढं महत्त्वाचं पद असतानाही, राज्यात, दिल्लीत सत्ता असतानाही आमच्या ताई साहेबांना नागापूरच्या वाण धरणात पाणी का आणता आलं नाही याचं उत्तर कुणी तरी विचारायला हवं. मुंडे साहेबांचं ते स्वप्न होतं की परळीत पंचतारांकित एमआयडीसी असावी, उपमुख्यमंत्री झाल्यावर तो प्रयत्नही झाला, तेव्हा एमआयडीसी झाली नाही. कारण, तेव्हा शेतकऱ्यांनी विरोध केला, पण या सत्ताकाळात एमआयडीसी का आली नाही,” असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांना केला होता.