…तोपर्यंत कमलनाथ सरकार पडले असं वाटत नाही : संजय राऊत
शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मध्य प्रदेशमधील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे (Sanjay Raut on Operation Lotus).
मुंबई : शिवसेनेचे संसदीय नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मध्य प्रदेशमधील राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे (Sanjay Raut on Operation Lotus). जोपर्यंत मध्य प्रदेश विधानसभेत विश्वासदर्शक ठराव होत नाही, तोपर्यंत कमलनाथ सिंह यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पडेल असं म्हणता येणार नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
संजय राऊत म्हणाले, “कर्नाटकमधील संकट वेगळं होतं, मध्य प्रदेशचं संकट वेगळं आहे. मध्य प्रदेशमध्ये जे झालं आहे त्याचं श्रेय भाजपनं घेवू नये. हा काँग्रेसमधील अंतर्गत विषय आहे. त्यातून झालेले हे स्फोट आहेत. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे मध्य प्रदेशातीलच नव्हे, तर देशातील तरुण नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांना सांभाळायला हवं होतं. तिथं काँग्रेस पक्षात मिस हँडलिंग झालं आहे.”
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही. कुणाला गुदगुल्या होत असतील, तर त्या अस्वलाच्या गुदगुल्या आहेत. अस्वलाची नखे लागतात आणि स्वतःलाच रक्तबंबाळ व्हावं लागतं. त्यामुळे भाजपनं स्वतःला गुदगुल्या करुन घेऊ नये, असाही सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला.
“महाराष्ट्रात भाजपचं ऑपरेशन कमळ फेल गेलं”
संजय राऊत म्हणाले, “ऑपरेशन कमळ वगैरे काही नसतं. 100 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात भाजपने याच ऑपरेशन कमळच्या माध्यातून 80 तासांचं सरकार बनवलं होतं. परंतु ते कसं ‘फेल’ गेलं, ऑपरेशन करणारेच कसे दगावले आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा कसा जन्म झाला, ते सरकार कसं मजबूत आहे याचं भान स्वप्न पाहणाऱ्यांनी ठेवावं. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात स्वप्न पाहू नये.”
सामनाचा अग्रलेख वाचत राहा. तो वाचण्यासाठी असतो, चर्चेसाठी नाही, असंही संजय राऊतांनी सांगत टोला लगावला.
Sanjay Raut on Operation Lotus