‘औरंगजेब कुणाला प्रिय?’ रोखठोकमधून काँग्रेसच्या ‘सेक्युलर’वादावर राऊतांचा निशाणा

| Updated on: Jan 17, 2021 | 7:11 AM

औरंगाबादच्या नामांतराच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरच निशाणा साधण्यात आला आहे.

औरंगजेब कुणाला प्रिय? रोखठोकमधून काँग्रेसच्या सेक्युलरवादावर राऊतांचा निशाणा
Follow us on

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. राज्यात या मुद्द्यावरुन राजकारणही चांगलंच तापलं आहे. इतकच काय तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आता याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेवरच निशाणा साधण्यात आला आहे. मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेस नामांतराला विरोध करत असल्याची टीका राऊतांनी रोखठोक या सदरातून केली आहे.(Sanjay Raut’s criticism on the secularist stance of the Congress)

हिंदुस्थानची घटना सेक्युलर आहेत. म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवेसी वगैरे लोकांना सेक्युलर कसे मानावे? औरंगजेबाला परधर्माचा भयंकर तिटकारा. त्याने शिखांचा हिंदूंचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्या? असा सवाल संजय राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेते अरविंद सावत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना विचारला होता.

काँग्रेसच्या भूमिकेवर टीकास्त्र

औरंगजेब कोण होता हे निदान महाराष्ट्राला तरी समजावून सांगण्याची गरज नाही. औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजीराजांच्या स्वाभिमानाची तलवार तळपली. आग्र्याहून सुटका ही वीरगाथा त्यानंतरच घडली. महाराष्ट्राने औरंगजेबाशी मोठा लढा दिला. त्या लढ्याचे नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. त्यामुळे सच्चा मराठी आणि कडवट हिंदू माणसाला औरंगजेबाविषयी लोभ असण्याचं कारण नाही. मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री औरंगाबाद असं नाव असलेल्या शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावे यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससारखे ‘सेक्युलर’ पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील व व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल. तिसरे म्हणजे औरंगाबादचे नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोथ करणारे उपस्थित करत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग आहेच. अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादी भूमिकेला आव्हान देत औरंगाबादच्या नामांतराला असलेल्या काँग्रेसच्या विरोधावर टीका केली आहे.

काँग्रेसची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचं नामांतर केल्याने लोकांचे आणि विकासाचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल केला होता. “राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. काँग्रेसच्या याच भूमिकेवर आता संजय राऊत यांनी रोखठोकमधून निशाणा साधला आहे.

हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे!

‘महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचयला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा सेक्युलर कधीच नव्हता. त्याने शिवाजी महाराजांचा शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचा भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!’ अशा शब्दात संजय राऊत यांनी आपलाच सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या :

Special Story | औरंगाबाद की संभाजीनगर? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाद आणि राजकारण!

औरंगाबादेत बॅनरवॉर, लव्ह औरंगाबाद बोर्डासमोर भाजपचे ‘नमस्ते संभाजीनगर’

आमचा सरकारमध्ये समान अधिकार, औरंगाबादच्या नामांतराला विरोध, काँग्रेसने ठणकावलं

Sanjay Raut’s criticism on the secularist stance of the Congress