Special Story | औरंगाबाद की संभाजीनगर? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाद आणि राजकारण!

औरंगाबाद शहरात सध्या बॅनरवॉर सुरु असल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा अधित पेटवला जात असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.

Special Story | औरंगाबाद की संभाजीनगर? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाद आणि राजकारण!
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 6:56 AM

मुंबई: देशाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या औरंगाबादच्या नामांतरावरुन सध्या जोरदार राजकारण रंगलं आहे. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याची शिवसेनेची जुनीच मागणी आहे. सध्या शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या मागणीला आता अधिक जोर चढत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला स्पष्ट विरोध आहे. त्यातच औरंगाबाद शहरात सध्या बॅनरवॉर सुरु असल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा अधित पेटवला जात असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.(Strong politics on the issue of renaming in the face of Aurangabad municipal elections)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत म्हणजे 1988 मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तेव्हापासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनाही संभाजीनगर असा उल्लेख करत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्येही संभाजीनगर असाच उल्लेख केला जातो. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा पहिला ठराव महापालिकेत 19 जून 1995 मध्ये मंजूर करुन तो राज्य सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारनंही 1995 मध्ये संभाजीनगर नावाची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. तेव्हा मुस्ताक अहमद यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावेळी शहराचं नाव बदलण्याचा अधिकार राज्य सरकारचा असल्याचं उच्च न्यायालयाने सांगितलं. पुढे 2001 मध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्य सरकारची अधिसूचना मागे घेतली. दरम्यान 1999 मध्ये शिवसेनेनं महापौर सुदाम सोनवणे आणि 2011 मध्ये महापौर अनिता घोडेले यांच्या काळात पुन्हा संभाजीनगरचा ठराव मंजूर केला होता.

लव्ह औरंगाबाद विरुद्ध सुपर संभाजीनगर

नामांतराच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाचे पडसाद औरंगाबाद शहरातही दिसून आले आहेत. 22 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबाद शहरातीलच ‘लव्ह औरंगाबाद’ या सेल्फी पॉईंटची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या कॅम्पेनिंग मध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्यामुळे औरंगाबादेत पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहराचं पूर्वीचं नाव असलेलं खडकी, औरंगाबादचे फलक लावण्यात आले. त्यात आय लव्ह औरंगाबाद, लव्ह प्रतिष्ठान, लव्ह खडकी असे डिस्प्ले लावून सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे दानवे यांच्या मातृभूमी प्रतिष्ठाने शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ “सुपर संभाजीनगर” असा डिस्प्ले तयार केला होता.

काँग्रेसची भूमिका काय?

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

नामांतरावर शरद पवार काय म्हणाले?

औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसनं परस्परविरोधी भूमिका मांडली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. आमच्यात वाद नाही, तुम्ही संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा, या प्रकरणाकडे मी गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या विषयावर मी कधीही भाष्य केलेलं नाही, असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

CMO च्या ट्विटर हँडलवर संभाजीनगर उल्लेख

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिघे एकत्र सत्तेत आहेत. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची भूमिका शिवसेनेनं मांडली असली तरी काँग्रेसनं त्याला तीव्र विरोध केला आहे. काँग्रेसच्या या विरोधानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला होता. त्यावरुनही थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विरोध दर्शवला होता. ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे,’ असं ट्वीट थोरात यांनी केलं होतं. तर महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र येऊन चर्चा केल्यानंतरच एखादा निर्णय घेतात. औरंगाबादच्या नामकरणाबाबतही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.(Strong politics on the issue of renaming in the face of Aurangabad municipal elections)

‘पुढे-पुढे पाहा काय होतंय!’ आदित्य ठाकरेंचं वक्तव्य

औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिलीय. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबाद शहरातील विविध विकासकामांचं उद्घाटन आज करण्यात आलं. आदित्य यांच्या दौऱ्याचं आणि कुठल्याही कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता नामांतर आणि विकासकामांच्या मुद्द्यांवरुन राजकारण सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

नामांतरावरुन प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना संभाजीनगरच्या मुद्द्यावर चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय. तर काँग्रेसनं संभाजीनगरच्या नावाला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा या मागणीला अँटी मुस्लिम भुमिकेचा वास येत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. शहराचं नाव बदलायचं असेल तर लोकांचं मत जाणून घ्या, त्यासाठी मतदान घ्या, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

AIMIM चा शिवसेना-भाजपवर आरोप

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर टीका करत निवडणुकीच्या तोंडावर राजकारण होत असल्याचा आरोप केला होता. इम्तियाज जलील यांनी ट्विटर पोस्ट टाकत शिवसेना चिप राजकारण करत असल्याचा आरोप केलेला. दर पाच वर्षांनी शिवसेना आणि भाजप हा विषय पुढे आणतात. पाणी, स्वच्छता, रस्ते आणि रोजगार या विषयाबद्दल भाजप आणि शिवसेना काही बोलत नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादमध्य शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. तीस वर्षात महापालिकेने शहरासाठी केलेले रचनात्मतक काम दाखवण्यासाठी नसल्यामुळं ते शहराच्या नावाचे राजकारण करत आहेत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.

औरंगाबादेतील कुठल्याही प्रकारची निवडणूक आणि नामांतराचा वाद हे समीकरणच बनलं आहे. यापूर्वीच्या जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये हा वाद वारंवार समोर आणला जातो आणि त्यावरुन जोरदार राजकारण रंगलेलं राज्यातील जनता पाहत आली आहे. त्यात आता फेब्रुवारी महिन्याचा अखेरीस महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशावेळी पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा गाजत असेल आणि त्यावरुन राजकारण रंगत असेल तर त्याबाबत आश्चर्य वाटायला नको.

इतर स्पेशल रिपोर्ट :

Special Story | लसीकरणाची नांदी आणि अर्थव्यवस्थेची घसरगुंडी; सोन्यातील गुंतवणूक ठरणार का फायदेशीर?

Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ

Strong politics on the issue of renaming in the face of Aurangabad municipal elections

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.