AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, राहुल गांधीकडून वाड्याची डागडुजी पण काहींची भाजपशी हातमिळवणी, राऊतांचा सनसनाटी अग्रलेख

काँग्रेससमोरच्या सगळ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचा नेमका काय गोंधळ उडालाय, काँग्रेस चुकतंय कुठे?, याचा वेध घेण्याचा अग्रलेखाच्या माध्यमातून प्रयत्न केलाय.

काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, राहुल गांधीकडून वाड्याची डागडुजी पण काहींची भाजपशी हातमिळवणी, राऊतांचा सनसनाटी अग्रलेख
संजय राऊत
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 01, 2021 | 6:39 AM
Share

मुंबई :   पंजाबच्या घडमोडींनी देशाच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षात राहणार नसल्याचं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धूंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. गेल्या 15  दिवसांपूर्वी पंजाबचा मुख्यमंत्री बदलून राहुल गांधींनी धाडसी पाऊल टाकलं. पण  आता काँग्रेससमोर मोठं संकट उभं ठाकलंय. सिद्धूही नाराज, कॅ. अमरिंदर सिंगही पक्ष सोडण्याच्या तयारीत…! काँग्रेससमोरच्या याच सगळ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचा नेमका काय गोंधळ उडालाय, काँग्रेस चुकतंय कुठे?, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली, असा आरोप करत पक्षात मूळच्या बोलघेवड्यांची कमी नाही, त्यात सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकायला नको होता, असा चिमटावजा सल्ला राऊतांनी काँग्रेसला घेतला आहे.

कॅप्टन अमरिंदर यांना दूर केलं, सिद्धूही गेले, काँग्रेसच्या हातात काय उरलं?

काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?

तिकडे 79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपात जातील, असे सांगितले जात होते, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असेदेखील त्यांनी म्हटले आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्डय़ात टाकतील, असे दिसत आहे.

शेतकऱ्यांची आक्रमकता त्यांना स्वराज्यात नको होती

कॅ. अमरिंदर म्हणतात, ‘मी तीन कृषी कायद्यासंदर्भात अमित शहांची भेट घेतली.” हे सपशेल झूट आहे. मुख्यमंत्री असताना हेच अमरिंदर पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगत होते, आंदोलन पंजाबात करू नका, तर दिल्लीत करा. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची ही आक्रमकता स्वराज्यात नको होती. मुख्यमंत्री असताना कॅ. अमरिंदर हे तीन कृषी कायद्यासंदर्भात किती वेळा दिल्लीत आले? उलट त्यांची भूमिका मोदी सरकारधार्जिणी व शेतकऱ्यांत फूट पाडण्याची होती असे सांगतात. आता हे महाराज शेतकऱ्यांचे कैवारी बनले. कॅ. अमरिंदर यांना केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही, असे मोदींचे धोरण आहे. कॅ. अमरिंदर यांचे वय 79 आहे. तेव्हा कसे काय होणार?

सिद्धूसारख्या उपऱ्यावर फाजील विश्वास टाकायला नको होता

पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यांवर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात.

राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात पण इतर लोक भाजपशी हातमिळवणी करतात

पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही नेतृत्वबदल होईल व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही जावे लागेल अशी हवा निर्माण झाली होती. ती पंजाबमुळे थंड पडली. जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाड्यातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात. वाड्यास रंगरंगोटी करु पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करु देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे.

काँग्रेस संपवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच. गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय?

काँग्रेस आजारी पडलीय तर भाजपला सूज आलीय

जितीन प्रसाद यांना काँग्रेसने केंद्रात मंत्रीपद दिले होते. हे प्रसाद भाजपात गेले व त्यांना उत्तर प्रदेशात मंत्री केले. भाजपकडे मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून आज लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, असा घोर लागला आहे. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का, याचा विचार व्हायला हवा.

काँग्रेसने उसळी मारावी, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना

काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली