मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन नेत्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी सेनेचा सावध पवित्रा

| Updated on: Feb 19, 2020 | 6:50 PM

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन नेत्यांचे राजीनामे, भाजपच्या आक्षेपापूर्वी सेनेचा सावध पवित्रा
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेनं मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या दोन नेत्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे (Resignation of Arvind Sawant and Ravindra Waikar). रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत या दोघांचेही राजीनामे घेतल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून आक्षेप घेण्याची कुणकुण लागल्याने शिवसेनेने सावध पवित्रा घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजपकडून ‘ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार’ आक्षेप घेण्याची तयारी केली होती. मात्र त्यापूर्वीच शिवसेनेने दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन ठेवले आहेत. वायकर आणि सावंत यांच्याकडून मात्र अशा कुठल्याही घटनेचा इन्कार करण्यात आला आहे. वायकर यांची 11 फेब्रुवारीला मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर 14 फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने अध्यादेश काढून ही नियुक्ती केली आहे. अध्यादेशात रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख वादाचे कारण बनलं आहे. “ऑफिस ऑफ प्रॉफिट” या नियमानुसार भाजपाकडून आक्षेप घेतला जाण्याची वा न्यायालयात धाव घेण्याची कुणकुण लागताच शिवसेनेचा सावध पवित्रा आहे.

वायकर आणि सावंत यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही. पण त्यांच्या पदांवर आक्षेप घेत वाद निर्माण झाल्यास राजीनाम्याची नामुष्की ओढवण्याची स्थिती निर्माण झाली, तर सावध उपाययोजना म्हणून दोघांकडून बॅक डेटेड राजीनामे घेतले गेल्याची जोरदार चर्चा आहे. किंवा सुधारित अध्यादेश काढून यांना संबंधित पदांवर कायम ठेवता येईल का? याबाबतची चाचपणी सुरु आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अशा पद्धतीची पदे निर्माण करण्यास सुरुवातीपासून विरोध होता अशी चर्चा मंत्रालयात होते आहे.

शिवसेनेने महाविकासआघाडीत सहभागी होत सत्ता स्थापन केली. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्तेचा वाटा विभागताना शिवसेनेचे अनेक नेते नाराजही झाले. या नाराज नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय अध्यादेश काढून अरविंद सावंत आणि वायकरांची मंत्रिपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता याच नियुक्त्या वाद्याच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने सावध पवित्रा घेतल्याचं बोललं जात आहे.

Resignation of Arvind Sawant and Ravindra Waikar