युती कधी होईल?, नार्वेकरांचा सवाल, चंद्रकांतदादा म्हणाले, तो माझ्यासाठी…

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील भेटगाठींनी शिवसेना-भाजप युतीची चर्चा जोर सुरू झाली आहे. पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नात उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांची भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

युती कधी होईल?, नार्वेकरांचा सवाल, चंद्रकांतदादा म्हणाले, तो माझ्यासाठी...
Uddhav Thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jan 29, 2025 | 11:46 PM

विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केलं. या भेटीनंतर मध्यंतरी आदित्य ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जवळ येण्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या चर्चांना अधिक बळ मिळणारी घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नेते, आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार की काय अशी चर्चा रंगली आहे. त्यातच चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील संवादाने या चर्चेला अधिकच बळ मिळताना दिसत आहे.

भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचं मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलात लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या लग्नाला उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत यांनीही हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात लग्न सोहळ्यात चांगल्याच गप्पाही रंगल्या. दोन्ही नेते हास्यविनोदही करत होते. सतत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे चंद्रकांत पाटील यांना पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

काय झाला संवाद?

यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यात मिश्किल संवाद रंगला. नार्वेकर यांनी हसता हसता युती कधी होणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना केला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही मिश्किल उत्तर दिलं. मीही त्याच सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहे, असं चंद्रकांतदादा यांनी म्हणताच दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.

Uddhav Thackeray

नेमकं काय म्हणाले?

मिलिंद नार्वेकर : (मिश्किलपणे) युती कधी होतेय?

चंद्रकांत पाटील : (मिश्किलपणे) तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण क्षण असेल..!

हशा आणि एकमेकांना टाळी देत दाद…

उद्धव ठाकरेंनी दोघांना (चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर ) विचारले, अरे काय कुजबुजताय?

त्यावर चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेना म्हणाले की, मीच हेच म्हणत होतो, युती होईल माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल! (पुन्हा हशा…)

भेटीगाठी…

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी 27 जुन 2024 रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधानभवनातील कार्यालयात ही भेट झाली होती. त्यावेळीही शिवसेना आणि भाजपची युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आज 29 जानेवारी मुंबईत लग्न सोहळ्यात या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us