Special Story: खलिस्तान चळवळ काय आहे? सुरुवात कुठून? भारताची डोकेदुखी का?; वाचा स्पेशल रिपोर्ट

खलिस्तानी चळवळ काय आहे?, या चळवळीची सुरुवात कुठून झाली? आणि भारताची डोकेदुखी काय आहे? या सर्व प्रश्नांची उलटतपासणी करण्यासाठी इतिहासात डोकावण्याचा केलेला हा प्रयत्न. (what is khalistan movement?, read special report)

Special Story: खलिस्तान चळवळ काय आहे? सुरुवात कुठून? भारताची डोकेदुखी का?; वाचा स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 8:21 AM

मुंबई: दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत. किंबहूना पंजाब- हरियाणाच्या शेतकऱ्यांचंच हे आंदोलन असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. त्यातच या आंदोलनात खलिस्तानी सहभागी झाल्याची आवईही उठली आहे. त्यामुळे ही खलिस्तानी चळवळ काय आहे?, या चळवळीची सुरुवात कुठून झाली? आणि भारताची डोकेदुखी काय आहे? या सर्व प्रश्नांची उलटतपासणी करण्यासाठी इतिहासात डोकावण्याचा केलेला हा प्रयत्न. (what is khalistan movement?, read special report)

खलिस्तानी चळवळ काय आहे?

देशाच्या फाळणीच्या काळापासून खलिस्तानचा प्रश्न निर्माण झालेला आहे. 1947मध्ये इंग्रजांनी भारताची फाळणी केली. त्यामुळे स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. त्याचवेळी काही शीख नेत्यांनी ‘खलिस्तान’ नावाने स्वतंत्र राज्याची निर्मिती करण्याची मागणी केली. स्वातंत्र्यानंतर पंजाबमध्ये पाकिस्तानच्या धर्तीवरच खलिस्तानची निर्मिती व्हावी अशी मागणी सुरू झाली. भाषिक आधारावर ही मागणी करण्यात आली. शीख फुटीरतावाद्यांनी सुरू केलेलं हे आंदोलन आहे. पंजाबच्या क्षेत्रात ‘खलिस्तान’ (‘खालसाची भूमी’) नावाने स्वायत्त राज्य स्थापन करण्याची त्यांची मागणी होती. शिखांची स्वत:ची मातृभूमी असावी या त्या मागचा हेतू होता. ‘पंजाबी सूबा आंदोलन’ (Punjabi Suba Movement) म्हणूनही हे आंदोलन ओळखलं जातं. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर स्वतंत्र राज्याची मागणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असं पंजाबमधील नेत्यांना वाटलं. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी करण्यासाठी पंजाबमध्ये प्रचंड हिंसक आंदोलनेही झाली. त्यात अनेकांचा मृत्यूही झाला होता.

रोष का?

काही इतिहास संशोधकांच्या मते खलिस्तान आंदोलनाची मूळं स्वातंत्र्याच्या चळवळीत आहेत. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाली. यावेळी मात्र, फाळणीचं तत्त्वं पंजाबमधील नागरिकांना पटलं नव्हतं. कारण फाळणी दरम्यान पंजाबचा बराचसा भाग पाकिस्तानात गेला होता. आपल्या वाडवडिलांची जमीन पाकिस्तानात गेली होती. ही जमीन सोडून शीख समुदायाला भारतात यावं लागलं. तर काही शीख नागरिक पाकिस्तानात राहिल्याने रक्ताच्या नात्यांची ताटातूट झाली. त्यामुळे शीख समुदायाच्या मनात असंतोष खदखदत होता. त्या असंतोषातूनच खलिस्तानची मागणी पुढे आली असल्याचं काही इतिहास संशोधकांना वाटतं.

खलिस्तानचं नाव कसं पडलं?

शिखांसाठी स्वतंत्र सुबा निर्माण करण्याची मागणी वारंवार होत होती. 1970मध्ये त्यानुषंगाने अनेक घडामोडी घडल्या. 1971 मध्ये गजतीसिंग चौहान यांनी अमेरिकेत जाऊन तेथील वृत्तपत्रांमध्ये खलिस्तान राष्ट्राच्या नावाने जाहिरात दिली. तसेच या जाहिरातीतून या आंदोलनासाठी निधी देण्याचं आवाहनही केलं. त्यानेच ‘खलिस्तान’ शब्दाचा वापर केला. त्यानंतर 1980मध्ये त्यांनी ‘खलिस्तान राष्ट्रीय परिषदे’ची स्थापना केली आणि या संघटनेचा अध्यक्ष म्हणून स्वत:ला घोषित केलं. लंडनमध्ये त्यानेच खलिस्तान देशाचं तिकीटही जारी केलं. 1978मध्ये जगजीतसिंग चौहानने अकालींशी हातमिळवणी करून स्वतंत्र खलिस्तान देशाच्या निर्मितीसाठी आनंदपूर साहिबच्या नावाने ‘संकल्प पत्र’ जारी केलं होतं.

अकाली दलाचा जन्म

खलिस्तान चळळीने संपूर्ण पंजाबमध्ये उग्ररुप धारण केलं. या आंदोलनामुळे पंजाबी प्रदेशाला भाषिक आधारावर पंजाबी आणि गैर पंजाबी प्रदेशात विभाजीत करण्याची मागणीही वाढली. त्यानंतर या आंदोलनाला सांप्रदायिक रंगही चढला. शिखांनी पंजाबी तर हिंदुंनी हिंदी ही आपली मातृभाषा म्हणून घोषित केली. त्याच दरम्यान अकाली दलाचा जन्म झाला. त्यावेळी अकाली दलाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अकाली दलाने 1950मध्ये या आंदोलनाला हवा दिली. पंजाबच्या कानाकोपऱ्यात जोरदार आंदोलन सुरू झालं. शेवटी 1966मध्ये ही मागणी मान्य करण्यात आली.

भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती

केंद्र सरकारने खलिस्तानची निर्मिती करण्याऐवजी भाषिक आधारावर हरियाणा, हिमाचल प्रदेश या स्वतंत्र राज्यांसह केंद्रशासित प्रदेश चंदीगडची स्थापना केली. मात्र, खलिस्तानची मागणी काही थांबली नाही. 70च्या दशकात खलिस्तान आंदोलनाने आणखी जोर धरला. 1972 मध्ये अकाली दलाने स्वायत्त राज्य आणि स्वतंत्र संविधानाचा मसुदा तयार करण्याचा प्रस्तावही मंजूर केला. पंजाबच्या नद्यांचं पाणी कोणत्याही परिस्थितीत हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाला देवू नये, असं अकाली दलाचं म्हणणं होतं. सरकारनं त्यांचं हे म्हणणं फेटाळून लावलं.

भिंडरावालेंचा उदय-अस्त

पुन्हा 1980मध्ये स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी खलिस्तान राष्ट्रीय परिषदेची स्थापना करण्यात आली. 80च्या दशकात खलिस्तान आंदोलन अधिक हिंसक आणि व्यापक होत होतं. 1980 ते 1984 दरम्यान पंजाबमध्ये दहशतवादी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचवेळी ‘दमदमी टकसाल’चे जनरल सिंग भिंडरावाले हे खलिस्तानचे नेते म्हणून उदयास आले. त्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे संपूर्ण पंजाब पेटून उठला होता. याच दरम्यान 1983मध्ये पोलीस महासंचालक अटवाल यांची पंजाबच्या सुवर्ण मंदिर परिसरात हत्या करण्यात आली. पुढे केंद्र सरकारच्या रडारवर आलेला भिंडरावालेंनी अटक टाळण्यासाठी सुवर्ण मंदिरात साथीदारांसह लपले. सशस्त्र संरक्षणात वावरणाऱ्या भिंडरावालेंनी शस्त्रास्त्र जमवण्याचा प्रयत्नही सुरू केला. त्यामुळे केंद्र सरकारने हिंसक घटना रोखण्यासाठी 1984मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या माध्यमातून सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला ‘ऑपरेशन सनडाऊन’ तयार करण्यात आलं. त्यासाठी 200 कमांडोजना ट्रेनिंग देण्यात आली. मात्र, या ऑपरेशनमुळे अधिक लोकांना नुकसान होऊ शकतं हे लक्षात आल्याने हे ऑपरेशन रद्द करण्यात आलं. त्यानंतर 1 जून 1984 केंद्र सरकारने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ सुरू करून सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवले. बराच काळ हे ऑपरेशन सुरू होतं. त्यात भिंडरावाले मारले गेले. तसेच त्याचे शेकडो समर्थकही मारले गेले.

धार्मिक कट्टरता आणि अराजकता

जनरल सिंग भिंडरावाला हे शीख धर्माचे कट्टर समर्थक होते. धार्मिक कट्टरकतेचं त्यांनी नेहमीच समर्थन केलं होतं. शिखांनी दारू पिणे, केस कापणे आदी गोष्टी करण्यास त्यांचा विरोध होता. त्यांनी या आंदोलनावर पकड मजबूत करताच पंजाबमध्ये अराजकता निर्माण झाली होती.

भिंडरावाले कोण होते?

ज्यावेळी खलिस्तानच्या मागणीने जोर धरला होता. त्यावेळी जनरल सिंग भिंडरावाले हे दमदमी टकसालमध्ये शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आले होते. त्यांची शीख धर्मावर निस्सीम श्रद्धा होती. त्यामुळेच तो शीख समुदायामध्ये अल्पकाळातच लोकप्रिय ठरले. टकसालच्या गुरुच्या मृत्यूनंतर भिंडरावाले वयाच्या अवघ्या 31व्या वर्षीच शिखांच्या पाच अकाल तख्तांपैकी एक असलेल्या दमदमी टकसालचे अध्यक्ष बनले. त्यांना धर्म गुरुचा दर्जा प्राप्त झाला. त्यांचा लोकांवर प्रचंड प्रभाव होता. त्यांनी सांगितल्याबरोबर लोक सिगारेट, दारू पिण्यासह मांस खाणे सोडून देत होते. भिंडरावाले नेहमीच शिखांच्या पारंपारिक वेषात असायचे. (what is khalistan movement?, read special report)

ऑपरेशन ब्लू स्टार, नेमकं काय घडलं?

ऑपरेशन ब्लू स्टारच्या माध्यमातून सुरुवातीला सुवर्ण मंदिराचं वीज-पाणी कापल्या गेलं. मंदिरात 6 जून 1984ला व्यापक अभियान राबवलं गेलं. प्रचंड गोळीबार झाला. भिंडरावालाचा मृतदेह मिळवण्यात सैन्याला यश आलं. 7 जून 1984 रोजी सैन्याने मंदिरावर ताबा मिळवला. सैन्य मंदिरात घुसल्याने शीख समुदायात प्रचंड रोष निर्माण झाला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच 31 ऑक्टोबर 1984मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यांच्याच दोन सुरक्षा रक्षकांनी ही हत्या घडवून आणली. (what is khalistan movement?, read special report)

84 नंतर काय घडलं?

>> 1984नंतर खलिस्तान आंदोलन संपल्याचं मानलं जात होतं. पण हे आंदोलन संपलं नव्हतं. धुमसतच होतं. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या संघटना उदयास आल्या. 23 जून 1985मध्ये ‘शीख राष्ट्रवादी संघटने’ने एअर इंडियाच्या विमानात स्फोट घडवून आणला. त्यात 329 लोक मारले गेले. हा भिंडरवालाच्या हत्येचा बदला असल्याचं आरोपींनी म्हटलं होतं.

>> 10 ऑगस्ट 1986मध्ये माजी सैन्यप्रमुख जनरल ए. एस. वैद्य यांची दोन बाईकस्वारांनी हत्या केली. वैद्य यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचं नेतृत्व केलं होतं. ‘खलिस्तान कमांडो फोर्स’ या दहशतवादी संघटनेने या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

>> 31 ऑगस्ट 1995मध्ये पंजाब सिव्हिल सचिवालयाजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटात पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेअंत सिंग मारले गेले. या स्फोटात 15 हून अधिक लोक मारले गेले होते.

>> या सर्व घटनांना खलिस्तानी संघटनांशी जोडलं जातंय. परदेशात बसून खलिस्तानी कट्टरतावादी भारतात या घटना घडवत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. (what is khalistan movement?, read special report)

चळवळी मोडीत, पण डोकेदुखी कायम

सध्या खलिस्तान आंदोलन निष्क्रिय झालं आहे. पंजाबच्या शहरी आणि ग्रामीण भागात या आंदोलनाबाबत आजच्या पिढीत काहीच आकर्षण नाही. मात्र, भारताच्या बाहेर राहत असलेल्या शीख समुदायात या आंदोलनाचा प्रभाव दिसून येतो. अधूनमधून या चळवळीचे नारेही ऐकायला येतात. काही विदेशी शक्तींद्वारे या आंदोलनाला हवा देण्याचा प्रयत्नही केला जातो. भारतात असंतोष निर्माण करणे हा त्यामागचा हेतू असतो. सध्या भारतात ही चळवळ मृतावस्थेत असली तरी ती संपलेली नाही. त्यामुळे भारतासाठी ही चळवळ डोकेदुखी असून अवघड जागेवरचं दुखणंही आहे, असं राजकीय अभ्यासक सांगतात. (what is khalistan movement?, read special report)

संबंधित बातम्या:

Special Story: ग्रामपंचायत निवडणुकीत शरद पवारांपेक्षा उद्धव ठाकरे उजळलेत का?

Special Story : चित्रपटांच्या मुद्द्यावरुन वाद का निर्माण होतात?; ‘फिक्शन’ आणि ‘नॉनफिक्शन’ म्हणजे नक्की काय?, वाचा सविस्तर

Special Story : शेतीपेक्षा मजुरी बरी!, दर तासाला 100 शेतकरी मजूर का होतात?

(what is khalistan movement?, read special report)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.