IND vs SL: अजिंक्य रहाणेचा मास्टरप्लॅन! बुमराह नसेल तर काय झालं, या गोलंदाजावर लावला डाव
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये होत आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 काय असावी? याची खलबतं सुरू आहेत. बुमराहच्या गैरहजेरीत मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून सिराज असेल. पण अजिंक्य रहाणेच्या मनात काही वेगळंच आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला एका पाठोपाठ एक असे दोन धक्के बसले. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन या स्पर्धेला दुखापतीमुळे मुकले. जसप्रीत बुमराहमुळे टीम इंडियाची गोलंदाजी बाजूच कमकुवत झाली. त्याची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. त्याच्या जागी आकिब नबीला संघात संधी दिली गेली. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही हा प्रश्न आहे. त्याला संधी मिळणं खूपच कठीण आहे. असं असताना या कसोटी सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने आपलं म्हणणं मांडलं आहे. जर पहिल्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असेल तर मोहमम्द सिराजसोबत आकिब नबीला संधी दिली पाहिजे. इतकंच काय तर भारतीय गोलंदाजाने पहिल्या कसोटी सामन्यात तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह उतरावं असा सल्लाही त्याने दिला आहे. पण दुसरा वेगवान गोलंदाज हा खेळपट्टीच्या परिस्तितीनुसार निवडावा असंही सांगितलं.
अजिंक्य रहाणेने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘प्लेइंग 11 मध्ये दोन वेगवान गोलंदाजापैकी एक मोहम्मद सिराज स्थान जवळपास पक्कं आहे. पण तिथली परिस्थिती वेगवान गोलंदाला अनुकूल असेल तर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकिब नबीला संधी दिली पाहिजे. पण खेळपट्टी सुकी असेल तर प्रसिद्ध कृष्णा अतिरिक्त गतीमुळे प्रभावी ठरू शकतो.’ बुमराह नसल्याने सर्वाधिक जबाबदारी ही मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे. पण श्रीलंकेतील परिस्थितीचं आकलन करणं खूपच कठीण आहे. कारण तिथे हिरवी खेळपट्टी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे, असं अजिंक्य रहाणे म्हणाला. त्यामुळे त्याने दोन वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना प्राधान्य द्यावं असं मत मांडलं आहे.
अजिंक्य राहणेने केलं नबीचं कौतुक
सलग दोन रणजी ट्रॉफी स्पर्धेत आकिब नबीने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याचं फळ त्याला मिळालं असून टीम इंडियात निवड झाली आहे. त्याच्या विकेट घेण्याची क्षमता असल्याचं सांगत अजिंक्य रहाणेने कौतुक केलं आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘नबीमध्ये संघात दुहेरी भूमिकेत गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. तो धावा रोखू शकतो आणि आक्रमक गोलंदाजी करून बळीही घेऊ शकतो. मागच्या दोन रणजी ट्रॉफी पर्वात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. ही काय सोपी बाब नाही. त्याला संघात संधी मिळेल, तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिळालेला अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप उपयुक्त ठरतो.’
