संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील चार सामन्यात शांत असलेली अभिषेक शर्माची बॅट अखेर बोलली. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकून फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. या डावात संजू सॅमसनचं योगदान खूपच महत्त्वाचं राहिलं. कसं काय ते जाणून घ्या

संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे
संजू सॅमसनमुळे अभिषेक शर्माच्या फलंदाजीला मिळालं बळ, गंभीर-सूर्याने असे टाकले होते फासे
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 27, 2026 | 4:38 PM

Abhishek Sharma, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियाला करो या मरोची लढाई करावी लागणार आहे. भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणार आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या जीवात जीव आला आहे. कारण अभिषेक शर्माला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध थोड्याफार धावा केल्या. पण झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अभिषेक शर्माने 30 चेंडूत 55 धावांची खेळी केली. यात चार चौकार आणि चार षटकार मारले. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने पहिलं अर्धशतक ठोकलं. त्याचा फॉर्म परतल्याने टीम इंडियाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण अभिषेक शर्माचा पत्ता चालला तर सामना एकतर्फी होतो असा अनुभव आहे.

अभिषेक शर्माचा असाच परतला नाही. तर त्यामागे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांची एक चाल होती. त्यांनी टाकलेले फासे अभिषेक शर्मासाठी फायदेशीर ठरले. सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं. इतकंच काय तर इशान किशनच्या जागी संधी दिली. त्यामुळे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन राइटी-लेफ्टी कॉम्बिनेशनसह उतरले. विचारपूर्वक ही जोडी उतरवण्याचा निर्णय घेतला होता. कारण मागच्या काही सामन्यात विरोधी संघ भारताचे दोन टॉप ऑर्डर लेफ्टी बॅट्समन पाहून ऑफ स्पिनरला गोलंदाजी सोपवत होते. त्यामुळे अभिषेक शर्मा अडचणीत येत होता.

संजू सॅमसन राइट हँडेड बॅट्समन आणि फिरकीचा सामना करण्यास सक्षम असल्याने झिम्बाब्वेची गोची झाली. त्यामुळे चेंडू वेगवान गोलंदाजाच्या हाती सोपवण्याशिवाय पर्याय उरला नाही. अभिषेक शर्माला वेगवान गोलंदाजांचा सामना करणं आवडतं. त्याची प्रचिती या सामन्यात आली. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. या स्पर्धेतील भारतीय संघाकडून केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. पावर प्लेमध्येच भारताने 80 धावा केल्या होत्या. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता.

Follow Us