Video: ‘आता रडवणार का?’ संजू सॅमसन कर्णधार सूर्यकुमार यादवला थेट म्हणाला…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने एन्ट्री मारली आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करत उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं. या विजयाचा शिल्पकार ठरला तो संजू सॅमसन.. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही त्याचं कौतुक केलं.

टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना 76 धावांनी गमवल्याने भारताचं उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला होता. पण त्यानंतर भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत केलं आणि स्थान पक्कं केलं. सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धचा विजय वाटतो तितका सोपा नव्हता. वेस्ट इंडिजने 20 षटकात 195 धावा केल्या आणि विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं होतं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहता भारताने कधीच इतकं मोठं आव्हान गाठलं नव्हतं. पण संजू सॅमसनने एकहाती किल्ला लढवला आणि संघाला विजय मिळवून दिला. संजू सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर हा विजय मिळाला. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली.
‘मी नेहमी सांगतो की, चांगल्या गोष्टी चांगल्या व्यक्तींसोबत योग्य वेळी घडतात. संजू सॅमसन पुढे आला आणि संघाला आवश्यक होतं ते केलं. जेव्हा संजू पुन्हा संघात आला होता. तेव्हा ग्रुप मीटिंगमध्ये सर्वात पहिली एकच गोष्ट सांगितली होती. संघाला जे हवे आहे ते करूया, तुम्हाला वैयक्तिकरित्या जे हवे आहे ते नाही. हे अनुभवाने येतं. तो कधी संघात आणि कधी बाहेर होता. त्याचा फलंदाजीचा क्रम बदलला जात होता. पण त्याने या सर्वांवर मात केली. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली.’ असं कर्णधार सूर्यकुमार यादव संजू सॅमसनबाबत म्हणाला.
‘संजू, त्याची पत्नी आणि त्याच्या कुटुंबासाठी मी खूप आनंदी आहे. त्याला मिळत असलेल्या सर्व आनंद आणि कौतुकास तो पात्र आहे. आम्ही विश्वचषक जिंकण्याच्या फक्त एक पाऊल जवळ आहोत आणि आशा आहे की, संजूचा फॉर्म असाच सुरू राहील.’ असं कौतुक सूर्यकुमार यादवने केलं. त्यानंतर संजू सॅमसनही, आता रडवणार का? असं मिश्किलपणे म्हणाला. टी20 वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. अभिषेक शर्मा आजारी असल्याने नामिबियाविरूद्ध खेळला. त्यानंतर पुन्हा बेंचवर बसून होता. सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध सामना गमवल्यानंतर संजूची उणीव भासली. त्याने या संधीचा फायदा घेतला आणि झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली.
