Cricket : ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला गार करणारा संघ इंडिया विरुद्ध 3 वनडे खेळणार, वेळापत्रक जाहीर
Indian Cricket Team : टीम इंडिया मायदेशात झिंबाब्वे विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत.

बीसीसीआयने गुरुवारी 26 मार्च रोजी टीम इंडियाचं मायदेशातील वेळापत्रक जाहीर केलं. त्यानंतर टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध कोणती मालिका आणि किती सामने खेळणार? हे स्पष्ट झालं आहे. टीम इंडिया एकूण 4 संघांविरुद्ध 22 सामने खेळणार आहे. एकूण 17 ठिकाणी हे 22 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाच्या मायदेशातील हंगामाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यानंतर होणार आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता ही 19 जुलै 2026 रोजी होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशातील हंगामातील आपली पहिला मालिका विंडीज विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर झिंबाब्वे भारत दौऱ्यावर येणार आहे. झिंबाब्वे याआधी 2002 साली भारत दौऱ्यावर आली होती. झिंबाब्वेने नुक्त्याच झालेल्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसारख्या वर्ल्ड चॅम्पियन संघाला गार करुन क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं.
झिंबाब्वेचा भारत दौरा 2027
टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात एकूण 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. ही मालिका नववर्षातील अर्थात 2027 या वर्षातील पहिल्या 10 दिवसांतच होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 3 जानेवारीला कोलकातातील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. भारत विरुद्ध झिंबाब्वे दुसरा सामना 6 जानेवारीला होईल. तर तिसरा आणि अंतिम सामना 9 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडेल.
टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 3 जानेवारी, कोलकाता
दुसरा सामना, 6 जानेवारी, तिरुवनंतपुरम
तिसरा सामना, 9 जानेवारी, मुंबई
झिंबाब्वे 2002 नंतर भारत दौऱ्यावर, तेव्हा काय झालं होतं?
याआधी झिंबाब्वे शेवटची 2002 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा उभयसंघात 2 कसोटी आणि 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. भारताने कसोटी मालिका 2-0 एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली. तर भारताने वनडे सीरिजमध्ये 3-2 ने विजय साकारला होता.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा धुव्वा
दरम्यान भारतात नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत झिंबाब्वेने जबरदस्त कामगिरी करत सुपर 8 पर्यंत धडक दिली होती. झिंबाब्वेने या दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि सहयजमान श्रीलंकेला पराभवाचा झटका दिला होता. त्यामुळे झिंबाब्वे सिकंदर रझा याच्या नेतृत्वात शुबमन गिल याच्या टीम इंडिया विरुद्ध कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
