BCCI Awards: शुबमन गिलचा बेस्ट क्रिकेटर म्हणून सन्मान, द्रविड-मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्कार
बीसीसीआय दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेटविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करणार आहे. यात वरिष्ठ ते कनिष्ठ पातळीवरील क्रिकेटपटूंचा सन्मान केला जाणार आहे. चला जाणून घेऊयात बीसीसीआयने कोणत्या खेळाडूंची निवड केली आहे ते..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंचा गौरव करण्याची धडपड सुरू झाली आहे. बीसीसीआयने दरवर्षी प्रमाणे यंदाही पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं आहे. यात टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा सन्मान केला जाईल. यासोबत क्रिकेटमधील इतर स्टार खेळाडूंना पुरस्कार दिला जाईल. वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल याला बीसीसीआयकडून मानाचा पुरस्कार मिळणार आहे. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये मागच्या वर्षी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी शुबमन गिलला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे. रविवारी 15 मार्च रोजी दिल्लीत बीसीसीआयकूडून नमन पुरस्कारांचं वितरण केलं जाईल. या पुरस्कार सोहळ्यात खेळाडू, माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांचा वेगवेगळ्या श्रेणीतील पुरस्कार देऊन सन्मान केला जाईल. यात गेल्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि इतरांचा समावेश असेल.
शुबमन गिलला पुरस्कार देणार, कारण की..
टीम इंडियाचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा सन्मान केला जाईल. इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, शुबमन गिलला मागच्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने हा पुरस्कार दिला जाणार आहे. कर्णधारपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यात त्याने 4 शतकं ठोकतं 754 धावा केल्या होत्या. तसेच मागच्या वर्षी चॅम्पियन्स विजयातही महत्त्वाचं योगदान दिलं होतं. यात त्याने एक शतक ठोकलं होतं. पण टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघात निवडलं नाही. दरम्यान शुबमन गिलने तिन्ही फॉर्मेटच्या 42 डावात 49 च्या सरासरीने 1746 धावा केल्या. यात 7 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
राहुल द्रविडला जीवनगौरव पुरस्कार
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात येईल. राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच प्रशिक्षक म्हणूनही योग्य जबाबदारी पार पाडली आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने 11 वर्षानंतर म्हणजेच 2024 साली टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यांच्या प्रशिक्षणात भारताने 2018 अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता.
दुसरीकडे, अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याचाही सन्मान केला जाणार आहे. मागच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याची दखल घेतली गेली आहे. मुंबईच्या आयुष म्हात्रेला देशांतर्गत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूसाठी लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. भारताच्या माजी महिला संघाची कर्णधार मिताली राजलाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
