रिंकू सिंहवर सर्वात मोठं संकट, मोठ्या आजारामुळे वडील थेट व्हेंटिलेटरवर, टीम इंडियात रिंकू परतणार का?
भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह याच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर तो संघाला सोडून दिल्लीला परतला आहे. आता त्याच्या वडिलांना नेमकं काय झालं, याची माहिती समोर आली आहे.

Rinku Singh Father Cancer : टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह याला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. मैदानात पाय ठेवताच त्याचे चाहते त्याचा जयजयकार करतात. फलंदाजी करतानाच त्याचा अंदाज तर अनेकांना भुरळ घालणारा आहे. भारतीय क्रिकेट संघात त्याला फिनिशर म्हणून ओळखले जाते. संघ कितीही संकटात सापडला तरीही तो फलंदाजीच्या जोरावर विजयश्री खेचून आणतो. याच रिंकू सिंहच्या कुटुंबावर मात्र सध्या मोठं संकट आलं आहे. सध्या टी-20 क्रिकेट स्पर्धा चालू असताना या संकटामुळे रिंकू सिंहला ही स्पर्धा सोडून कुटुंबाकडे परतावे लागले आहे.
रिंकूच्या कुटुंबाला नेमकं काय झालंय?
मिळालेल्या माहितीनुसार रिंकू सिंह याचे वडील खानचंद्र सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. सध्या त्यांना ग्रेटर नोएडा येथे रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. खानचंद्र सिंह यांची प्रकृती नेमकी का बिघडली आहे, हे अद्याप समोर आले नव्हते. आता मात्र त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार खानचंद्र सिंह यांना यकृताचा (लिव्हर) कर्करोग झाला आहे. हा कर्करोग चौथ्या पातळीवर असल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ही माहिती समजताच रिंकू सिंह 24 फेब्रुवारी रोजी चेन्नईहून दिल्लीला पोहोचले. ते ग्रेटर नोएडा येथे आपल्या वडिलांना भेटायला गेले आहेत.
रिंकू सिंह पुन्हा संघात परतणार का?
वडिलांना कर्करोग झाल्यामुळे आता रिंकू सिंह संघात परतणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार रिंकू सिंह लवकरच पुन्हा एकदा भारतीय संघात परतू शकतो. वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे रिंकू सिंह ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी होऊ शकला नाही. त्याला लवकरच वडिलांच्या भेटीला जावे लागले. त्यामुळे तो झिम्बॉम्बेविरोधातील सामन्यात संघाबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, टी-20 स्पर्धेमध्ये रिंकू सिंह संघाचा भाग असला तरीही त्याला फलंदाजीमध्ये अद्याप लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. पाचही सामन्यांत त्याला 15 पेक्षा जास्त धावा करता आलेल्या नाहीत.
