जापानमध्ये असं कसं? तंबूत ड्रेसिंग रूम आणि वॉशरुम 500 मीटर दूर! एशियन्स गेम्स व्यवस्थेवर बीसीसीआयची नाराजी
एशियन गेम्स 2026 स्पर्धा जापानमध्ये होत आहे. मात्र या स्पर्धेत क्रिकेटसाठी असलेल्या व्यवस्थेवरून नाराजी व्यक्त होत आहे. ड्रेसिंग रूम आणि वॉशरूमच्या सुविधेवरून बीसीसीआयने कोरडे ओढले आहेत. नेमकं काय ते जाणून घ्या.

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचं 20वं पर्वाची जय्यत तयारी झाली आहे. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचं यजमानपद जापानकडे आहे. ही क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जापानमध्ये आयची आणि नागोया येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेत महिला क्रिकेटचे सामना 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर आणि पुरूष क्रिकेटचे सामना 24 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. जापानमध्ये ही स्पर्धा होत असल्याने चोख व्यवस्था असेल प्रत्येकाला वाटतं. कारण हा देश स्वच्छता आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करणार आहे. पण जापानच्या क्रिकेट व्यवस्थेवर बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे. क्रिकेट सामन्यांच्या सुमार नियोजन आणि सुविधेतील त्रुटींवर बोट ठेवलं आहे. मैदानात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा ठपका ठेवला आहे. जापानमधील गैरव्यवस्थेमुळे बीसीसीआय आणि आशियाई क्रिकेट परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने एएनआयला सांगितले की, जापानमधील क्रिकेटपटूंसाठी असलेल्या सुविधा आणि व्यवस्थेवर बीसीसीआय आणि एसीसी समाधानी नाहीत आणि एक निरीक्षक पाठवून चाचपणी केली जाईल.
क्रिकेटपटूंना पक्के बांधकाम असलेले ड्रेसिंग रूम बनवण्याऐवजी मैदानावरच तात्पुरते टेन्ट ठोकून ड्रेसिंग रूम तयार करण्यात आले आहेत. इतकंच काय तर खेळाडूंसाठीचे वॉशरून टेंटपासून तब्बल 500 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे खेळाडूंची मोठी गैरसोय होणार आहे. सध्या बीसीसीआय तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाटी एक पर्यवेक्षक तिथे पाठवणार आहे. जर व्यवस्थेत काही सुधारणा झाली नाही तर मुख्य संघाऐवजी बी टीम जापानला पाठवण्याचा विचार केला जाईल. इतकंच काय तर खेळाडूंना राहण्यासाठी हॉटेलमधील रूमदेखील छोटे आहेत. एका खोलीत दोन खेळाडू आणि त्यांच्या मोठ्या किटबॅग ठेवल्या की पाय ठेवायलाही जागा उरणार नाही अशी स्थिती आहे.
एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताने आधीच संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असून तिलक वर्मा उपकर्णधार आहे. तसेच अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रवि बिश्नोई आणि वरूण चक्रवर्ती यांची निवड केली आहे. जर असुविधा तशाच राहिल्या तर मात्र हा संघ डावलून बी टीम पाठवली जाण्याची शक्यता आहे.
