
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर ध्येय, सातत्य आणि चिकाटी महत्त्वाची असते. सहजासहजी काहीही मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत आणि अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. हीच बाब क्रिकेटपटूंनाही लागू होते. चांगली वाईट कशीही स्थिती असोत खेळाडूंना क्रिकेटला प्राधान्य द्यावं लागलं. अवघ्या काही दिवसांपूर्वी भारताचा क्रिकेटपटू रिंकु सिंह याच्या वडिलांचं निधन झालं. मात्र वडिलांच्या निधनाच्या काही तासांनंतर रिंकु टीम इंडियासह जोडला गेला. अनेक खेळाडूंना आपल्या जबाबदारीमुळे कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही. अनेक गोष्टींसह तडजोड करावी लागते. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यालाही याचा प्रत्यय आला.
अर्जुन लग्नाच्या काही तासांनंतर एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टीमसह जोडला गेला. मात्र अर्जुनला मोठा झटका लागला. अर्जुन आणि त्याच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑलराउंडर अर्जुन तेंडुलकर याचं गुरुवारी मुंबईत सानिया चांढोक हीच्यासह विवाह पार पडला. अर्जुनच्या लग्नाला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. अर्जुनच्या लग्नाची चांगलीच चर्चा रगंली. अर्जुनच्या लग्नात त्याची मोठी बहिण सारानेही चांगलाच भाव खाल्ला. संपूर्ण सोहळा निर्विघ्न पार पडला.
लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्य साधारणपणे देवदर्शनाला किंवा विदेश दौऱ्यावर जातात. मात्र अर्जुनने या सर्व प्रकाराला छेद देत क्रिकेटला प्राधान्य दिलं. अर्जुन लग्नानंतर थेट जर्सी घालून मैदानात हजर झाला.
अर्जुन लग्नानंतर नवी मुंबईत आयोजित डीवाय पाटील टी 20 स्पर्धेत सहभागी झाला. अर्जुन या स्पर्धेत डीवाय पाटील ब्लू टीमचं प्रतिनिधित्व करत आहे. अर्जुन उपांत्य फेरीचा सामना असल्याने लग्नानंतर सामन्यासाठी हजर राहिला. मात्र या सामन्यात अर्जुनच्या टीमला पराभूत व्हावं लागलं.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात अर्जूनच्या टीमसमोर मुंबई कस्टमचं आव्हान होतं. मुंबई कस्टमने हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक दिली.
युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र वैभव भोपळाही फोडण्यातही अपयशी ठरला. तसेच अर्जुन 9 धावांवर आऊट झाला. कॅप्टन शशांक सिंह याने टीमसाठी सर्वाधिक 42 धावांचं योगदान दिलं. अर्जुनच्या संघाने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये जवळपास 8 च्या रनरेटने 156 धावा केल्या. प्रत्युत्तराच मुंबई कस्टमने विजयी आव्हान हे 24 बॉलआधीच अर्थात 16 ओव्हरमध्ये पूर्ण करत अंतिम फेरी गाठली. या एका पराभवामुळे अर्जूनच्या टीमची इथवर पोहचण्याची सर्व मेहनत वाया गेली.