IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता एका संघाला किती सामने जिंकावे लागतील? आठ संघात अशी चुरस
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत जाणार आहे. आता दहापैकी दोन संघ या शर्यतीतून आऊट झाले आहेत. तर आठ संघात टॉप 4 साठी चुरस आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती सामने जिंकायचे आहेत ते

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता एका संघाला किती सामने जिंकावे लागतील? आठ संघात अशी चुरसImage Credit source: TV9 Network
आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफसाठी चुरशीची लढाई आहे. आता प्रत्येक संघांचे दोन ते तीन सामने शिल्लक आहे. या सामन्यातील निकालानंतर प्लेऑफचं चित्र स्पष्ट होणार आहे. गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे अव्वल 4 संघांमध्ये आहेत. पण त्याचं स्थानही काही पक्कं नाही. पण गुजरात टायटन्सचं गणित सुटलं आहे आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तर लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या स्पर्धेतून आऊट झाले आहेत. त्यामुळे उर्वरित आठ संघात प्लेऑफची चुरस आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी एका संघाला किती सामने जिंकावे लागतील ते जाणून घेऊयात
- शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सनेही 12 सामने खेळले आहेत. यात 4 सामने गमावले असून 8 सामने जिंकले आहेत. सध्या 16 गुणांसह गुजरात टायटन्सचे प्लेऑफमध्ये खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. जर पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला, तर 18 गुणांसह अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. सध्या 14 गुण असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुढील तीन सामन्यांपैकी एक सामना जिंकावा लागेल.
- पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. सध्या 14 गुण असलेला हैदराबाद संघ पुढील उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो.
- श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघाने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. सहा विजयांसह पंजाब एकूण 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे 17 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरण्याकरिता पंजाब किंग्सला पुढील तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकावे लागतील.
- ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी सहा सामने जिंकले आहेत. उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्यास चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.
- रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सनेही 11 सामने खेळले आहेत. या 11 सामन्यांपैकी सहा सामने जिंकून 12 गुण मिळवलेल्या राजस्थानला पुढील तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकणं भाग आहे. 16 गुण झाल्यास हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो.
- अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. केकेआरने फक्त 4 सामने जिंकले आहेत. पंजाब किंग्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना 1 गुण मिळाला आहे. सध्या 9 गुण असलेला केकेआरने पुढचे 4 सामने जिंकल्यास 17 गुणांसह थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करेल.
- अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने 12 सामने खेळले असून 5 विजय आणि 7 पराभव पत्करले आहेत. 10 गुण मिळवलेला दिल्ली कॅपिटल्स संघ पुढील 2 सामने जिंकल्यास 14 गुण मिळवू शकतो. पण दिल्ली कॅपिटल्सला नेट रन रेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळेल.
Follow Us
