Sydney Test: माझं वक्तव्य अश्विनला झोंबलं असेल, तर मला आनंदच आहे, शास्त्रींचा अश्विनवर पलटवार
"तुम्हाला तुमच्या कोचने आव्हान दिलं, तर तुम्ही काय कराल? घरी जाऊन रडत बसाल, सांगाल मी येत नाही. कोचला चुकीचं सिद्ध करण्यासाठी एक खेळाडू म्हणून मी ते आव्हान स्वीकारेन"
नवी दिल्ली: भारताने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. त्यावेळी सिडनी कसोटीत रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) जागी कुलदीप यादवची (Kuldeep yadav) निवड का केली? त्या बद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shastri) यांनी गुरुवारी सांगितले. चायनामन गोलंदाजी करणाऱ्या कुलदीपची कामगिरी त्यावेळी चांगली होती. तो संघात निवडीसाठी पात्र होता, असे शास्त्री यांनी सांगितले. अश्विनच्या जागी संघात निवड झाल्यानंतर कुलदीपने संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. पहिल्या डावात त्याने ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट घेतल्या.
खरंतर त्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता. चार दिवसांच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं होतं. पण पावसामुळे ऑस्ट्रेलियाला तो कसोटी सामना ड्रॉ करता आला. संघात निवड न झाल्यामुळे अश्विनने नाराजी प्रगट केली होती. कुलदीपचे कौतुक करताना शास्त्रींनी त्यावेळी जाहीरपणे, परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये कुलदीप यादव पहिली पसंती असल्याचे म्हटले होते. ‘शास्त्रींचे ते वक्तव्य ऐकून मी आतून कोसळलो होतो’ असे अश्विनने अलीकडचे एका मुलाखतीत म्हटले होते.
शास्त्रींना अजिबात खंत नाही भारतासाठी 80 कसोटी सामने आणि पाच वर्ष प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या रवी शास्त्रींना आपल्या या वक्तव्याबद्दल अजिबात खंत नाहीय. उलट त्यानंतर अश्विनच्या कामगिरीत सुधारणाच झाली, असे त्यांचे मत आहे. “सिडनी कसोटीत अश्विन खेळला नाही. कुलदीपने चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे कुलदीपला संधी देण्याचा निर्णय योग्यच होता. त्यामुळे अश्विनला दु:ख झालं असेल, तर मी आनंदीच आहे. कारण त्यामुळे त्याच्यात वेगळं काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. प्रत्येकाचं कौतुक करणं माझं काम नाही. वास्तव सांगण माझं काम आहे” असे शास्त्री म्हणाले.
तुम्हाला चॅलेंज दिलं, तर तुम्ही काय करालं? “तुम्हाला तुमच्या कोचने आव्हान दिलं, तर तुम्ही काय कराल? घरी जाऊन रडत बसाल, सांगाल मी येत नाही. कोचला चुकीचं सिद्ध करण्यासाठी एक खेळाडू म्हणून मी ते आव्हान स्वीकारेन” असं शास्त्री यांनी सांगितलं. “कुलदीप बद्दलच माझं वक्तव्य अश्विनला लागलं असेल, तर असं वक्तव्य केल्याचा मला आनंदच आहे. त्याला वेगळं काहीतरी करावसं वाटलं” असे शास्त्री इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. कुलदीप आज भारतीय कसोटी संघाचा भाग नाहीय, तर अश्विन कसोटी संघात प्रमुख गोलंदाजाची भूमिका बजावतोय, हे वास्तव आहे.
संबंधित बातम्या: Sachin Tendulkar : सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं, सचिन तेंडुलकरच्या शाबासकीनंतर मोहम्मद सिराज म्हणाला… आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सलामीच्या लढतीमध्ये भारताचा विजय; यूएईवर 154 धावांनी मात IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर