IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेचा शेवटही निराशाजनक झाला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिकाही गमावली. रोहित शर्माने दमदार शतकी खेळी केली, पण विजय मिळवता आला नाही.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 19, 2026 | 11:49 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामन्याचा निकाल निराशाजनक लागला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने या निर्णयाचा पुरेपूर फायदा उचलला. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी अक्षरश: रडवलं. तसेच 50 षटकात 3 गडी गमवून 387 धावा केल्या. यासह भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान काही भारतीय संघाला गाठता आलं नाही. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 360 धावा केल्या. हा सामना भारताने 27 धावांनी गमावला. यासह भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 ने गमावली आहे. टी20 मालिकेनंतर भारताचा वनडे मालिकेतही पराभव झाला आहे. दुसरीकडे, रोहित शर्माच्या शतकी खेळीही पाण्यात गेली.

इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 388 धावांचं आव्हान गाठताना भारताने आश्वासक सुरूवात केली. खरं तर हे खूपच कठीण आव्हान होतं. पण कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चांगली सुरूवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. शुबमन गिल 77 धावा करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 86 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. ही जोडी असेपर्यंत भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र ही जोडी फुटली आणि पराभवाची स्क्रिप्ट लिहिण्यास सुरूवात झाली. रोहित शर्मा 110 चेंडूत 138 धावा करून बाद झाला. यानंतर भारताच्या धावगतीत कमालीचा घसरण झाली.

रोहित शर्माच्या विकेटनंतर मैदानात आलेला इशान किशनही काही खास करू शकला नाही. त्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या आणि तंबूत परतला. उपकर्णधार श्रेयस अय्यर सामना संपवेल अशी आशा होती. पण त्याने तीन चेंडू खेळले आणि शून्यावर बाद झाला. त्यामुळे झटपट धावा करण्याचा भार एकट्या विराट कोहलीवर आला. त्याने 60 चेंडूत 74 धावांची खेळी केली. पण उत्तुंग फटका मारण्याचा नादात बाद झाला. कारण धावा आणि चेंडूत याच्यात कमालीची तफावत होती. त्यामुळे त्याला जोखीम घेण्याशिवाय पर्याय नव्हता. केएल राहुल 8 चेंडूत 12 धावा करून बाद झाला आणि पराभव निश्चित झाला.

Follow Us