बीसीसीआयशी पंगा महागात! बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काकुळतीला, कोट्यवधींचं नुकसान आणि लीग बंद करण्याची वेळ
बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची पुरती वाट लागली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारताशी घेतला पंगा महागात पडला आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला भिकेचे डोहाळे लागले आहेत. बीसीसीआयशी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यान घेतलेली आडमुठी भूमिका आता अंगाशी येताना दिसत आहे. भारतासोबत टी20 मालिका आयोजित करण्यासाठी सुरू असलेली धडपड पुन्हा एकदा फेल गेली आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ बांगलादेशात अशी टिमकी बांगलादेश क्रिकेट बोर्ड वाजवत होता. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण अफगाणिस्तानने भारतासोबत टी20 मालिकेचं वेळापत्रक सप्टेंबरमध्ये जाहीर केलं आणि बांगलादेशची पुन्हा नाचक्की झाली. असं असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबाल यांनी पु्न्हा चर्चेचं गुऱ्हाळ सुरू केलं आहे. तमीम यांनी सांगितलं की, भारतासोबत मालिकेसंदर्भात चर्चा सुरू आहे आणि तारीख बदलली जाऊ शकते.
भारत बांगलादेश मालिका अजूनही पूर्णपण रद्द झालेली नाही, असंही इकबाल म्हणाले. बांगलादेशमध्ये 28 ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या देशांतर्गत ‘गेम डेव्हलपमेंट ट्रॉफी’ या स्पर्धांमुळे भारताच्या दौऱ्यावर परिणाम होणार नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं. ही स्पर्धा मीरपूरमध्ये होणार आहे. पण गरज पडली तर ढाक्यातील बशुंधरा ग्राउंडवर स्थलांतरीत करू, असंही त्यांनी सांगितलं. भारतासोबतची मालिका ठरल्यानंतर देशांतर्गत सामन्यांचं वेळापत्रक आखलं जाईल. दरम्यान, भारताचा बांग्लादेश हा दौरा यापूर्वी 2025 मध्ये होणार होता. पण राजकीय अस्थिरतेमुळे भारताने जाणं टाळलं. त्यानंतर सप्टेंबर 2026 साठी पुढे ढकलण्यात आला होता. पण तिथेही भारत अफगाणिस्तान मालिका ठरल्याने गणित फिस्कटलं.
दरम्यान, बीसीसीआयच्या सांगण्यावरून कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने बांगलादेशी अष्टपैलू मुस्तफिझुर रहमाला संघातून काढलं होतं. या निर्णयानंतर, अमीनुल इस्लाम यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारत श्रीलंका येथे होणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बराच वाद रंगला होता. त्यानंतर बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड संघाला संधी मिळाली होती. आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. तमीम यांच्या हाती सूत्र आल्यापासून बीसीसीआयसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यंदा बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धा रद्द होण्याची शक्यता बळावली आहे. बीसीबी अध्यक्ष तमीम इकबाल यांनी सांगितलं की, मागच्या दोन पर्वात बांग्लादेश प्रीमियर लीगमुळे 40 कोटी बांग्लादेशी टका (म्हणजेच 31 कोटी) रूपयांचं नुकसान झालं आहे.
