Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?
India Women Semi Final Scenario: हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाला रविवारी 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरीसाठी किती संधी आहे. जाणून घ्या.

भारतीय महिला संघ झकास सुरुवातीनंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने रविवारी 21 जून रोजी भारताचा विजयरथ रोखून एकूण दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत करुन सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र तसं झालं नाही. भारताला हा सामना जिंकून उपांत्य फेरीची वाट जवळपास मोकळी करण्याची संधी होती. मात्र आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला उपांत्य फेरीची किती संधी आहे? हे जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिकेने मँचेस्टरमध्ये आयोजित सामन्यात भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. या पराभवानंतरही भारताला उपांत्य फेरीची संधी कायम आहे. मात्र काही प्रमाणात चिंता वाढली आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलियाही आहे. त्यामुळे भारताला स्वत:च्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.
पॉइंट्स टेबलमधील स्थिती
टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये 3 सामन्यांतील 2 विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेनेही भारताप्रमाणे 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. मात्र भारतापेक्षा नेट रनरेट कमी असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. मात्र तसं असलं तरी दक्षिण आफ्रिकेसाठी आगामी 2 सामने तुलनेत सोपे आहेत. दक्षिण आफ्रिका आगामी 2 सामन्यांत नेदरलँड्स आणि बांगलादेश विरुद्ध 2 हात करणार आहे. तर टीम इंडियाला बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित 2 क्रिकेट सामन्यांत खेळायचं आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत नेट रनरेट चांगला असणं भारतासाठी जमेची बाब आहे.
भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण
आता भारताला उपांत्य फेरीत पोहचायचं असेल तर उर्वरित 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच भारत 2 पैकी एका सामन्यात पराभूत झाल्यास दक्षिण आफ्रिकेने किमान 1 सामना गमवावा तर महिला ब्रिगेडला नेट रनरेटमध्ये आणखी फायदा होईल.
नेट रनरेट महत्त्वाचा का?
नेट रनरेटचा अपवाद वगळल्यास भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांची स्थिती सारखीच आहे. आता या दोन्ही संघांनी उर्वरित 2 सामने जिंकले तर त्यांचे प्रत्येकी 8-8 गुण होतील. तसेच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केल्यास त्यांचेही 8 गुण होतील. अशा परिस्थितीत नेट रनरेटच्या आधारे उपांत्य फेरीतील 2 संघ निश्चित होतील. त्यामुळे उर्वरित सामन्यांत नेट रनरेट हा महत्त्वाचा ठरणार आहे.
