SRH vs MI : हैदराबादचा सहावा पराभव, पॅट कमिन्सचं डोकं फिरलं, कुणावर बिल फाडलं?
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Ipl 2025 : सनरायजर्स हैदराबादला घरच्या मैदानात पुन्हा एकदा पराभूत व्हावं लागलं. मुंबईने हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादच्या या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स याने काय म्हटलं?

सनरायजर्स हैदराबाद टीम आयपीएल 2025 मध्ये धमाकेदार सुरुवातीनंतर पूर्पणणे भरकटली आहे. हैदराबाद टीममध्ये एकसेएक फलंदाज असूनही त्यांना कमबॅक करणं अजून जमलं नाहीय. हैदराबादचे फलंदाज बुधवारी 23 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध पु्न्हा अपयशी ठरले. हैदराबादला मुंबईसमोर 143 धावाच करता आल्या. ट्रेन्ट बोल्ट याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत ट्रेव्हिस हेड-अभिषेक शर्मा या स्फोटक आणि गेमचेंजर खेळाडूंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे हैदराबादला या 18 व्या मोसमात एकूण सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हैदराबादचं प्लेऑफचं समीकरण आणखी बिघडलं आहे. मुंबई विरूद्धच्या या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्स याचं डोकं फिरलं आणि त्याने फलंदाजांबाबत प्रतिक्रिया दिली.
हैदराबादने घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात राजस्थान विरुद्ध 286 धावांचा डोंगर उभा केला. मात्र हैदराबादला याच खेळपट्टीवर मुंबई विरुद्ध फक्त 143 धावाच करता आल्या.
पॅट कमिन्स काय म्हणाला?
“हे सर्व काही खेळपट्टी कशी आहे? हे समजून घेण्यावर अवलंबून आहे. आम्ही पहिल्या सामन्यात 280 पेक्षा अधिक धावा केल्या. मात्र त्यानंतर पुन्हा या मैदानावर आमचे फलंदाज मोठी धावसंख्या करु शकले नाही. खेळपट्टी न समजणं हेच सर्वात मोठा कारण आहे. बाकी हा टी 20 गेम आहे, इथे काय होईल हे सांगू शकत नाही. आम्हाला आता घराबाहेर आणखी काही सामने खेळायचे आहेत. आता हे सर्व खेळपट्टी लवकरात लवकर समजून घेण्यावर अवलंबून आहे. काही दिवस पूर्ण ताकदीने खेळ होईल. तर काही दिवस असंही होऊ शकतं”, असं पॅटने नमूद केलं.
ट्रेंट बोल्टनंतर रोहित शर्माचा कहर
दरम्यान ट्रेंट बोल्ट याने हैदराबादला 4 झटके दिले. टॉप ऑर्डरमधील फलंदाज ढेर झाले. त्यानंतर हेनरिक क्लासेन याने 71 धावा केल्या. तर अभिनव मनोहर याने 43 धावाचं योगदान दिलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 99 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या.
ट्रेंट बोल्ट यानंतर रोहित शर्मा याने मुंबईच्या विजयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रोहितने चेन्नईनंतर हैदराबाद विरुद्धही वादळी खेळी केली. रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 70 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद 40 धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात विजयी आव्हान गाठलं. मुंबईने अशाप्रकारे सात विकेट्सने सामना जिंकला आणि एकूण सहावा विजय मिळला.