IPL 2026: हैदराबादच्या विजयानंतर चेन्नईचं प्लेऑफचं गणित चुकलं, कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेतील 63वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना सनरायझर्स हैदराबादने 5 गडी राखून जिंकला. यासह प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशांना सुरूंग लागला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 63व्या सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 20 षटकात 7 गडी गमवून 180 धावा केल्या. तसेच विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं.हे आव्हान गाठताना सनरायझर्स हैदराबादला पावरप्लेमध्येच दणका बसला. त्यामुळे हा सामना त्यांच्या हातून जाईल असं वाटलं. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड स्वस्तात बाद झाले. या दोघांच्या विकेटनंतर हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांनी डाव सावरला. या दोघांनी सुरूवातीला सावध फलंदाजी केली. मात्र धावा आणि चेंडू यांच्यातील वाढतं अंतर पाहून फटकेबाजी करत डाव सावरला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सपासून डाव लांब गेला. इशान किशनने इशान किशनने 47 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार मारत 70 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे विजय सोपा झाला.
कर्णधार ऋतुराज गायकवाड काय म्हणाला?
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ‘क्रिकेटचा सामना चांगला झाला. खेळपट्टी चांगली होती, त्यात फारसा बदल केला नाही. काही संधी हुकल्या, पण तरीही मुलांचा अभिमान वाटतो. प्रतिस्पर्धी संघाची विकेट गेल्यानंतर मिळालेल्या संधीचे सोने करणे आवश्यक होते, पण ते जमले नाही. खरं सांगायचं तर, अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. सॅमसन आमच्यासाठी खूप चांगला खेळत आहे. काही महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर होते. हे अनेक घटकांवर अवलंबून असते. आज प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केले, मुलांचा अभिमान वाटतो. चाहते प्रत्येक परिस्थितीत आम्हाला पाठिंबा देतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आमची कामगिरी खूपच चांगली होती.’
सनरायझर्स हैदराबादचा विजय आणि गुजरातचा फायदा
सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना जिंकला आणि 13 सामन्यांनंतर त्यांचे 16 गुण झाले. त्यामुळे आरसीबीनंतर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स हे संघ पात्र ठरले आहेत. चेन्नईला हरवण्याचा फायदा केवळ हैदराबादलाच नाही, तर गुजरात टायटन्सलाही झाला आहे. गुजरात टायटन्स संघही आपला अंतिम गट फेरीचा सामना खेळण्यापूर्वीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे.
