RCB vs KKR : रायपूरमध्ये पावसाची बॅटिंग, सामन्याला विलंब, केकेआर प्लेऑफमधून आऊट?
RCB vs KKR Rain, IPL 2026 : रायपूरमध्ये जोरदार पावसामुळे आरसीबी आणि केकेआर या दोन्ही संघांसह चाहत्यांची चिंता वाढली आहे. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीने सामन्यातील 1 तासपेक्षा अधिक वेळ वाया घालवला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात गेल्या काही मोसमांपासून संध्याकाळी सामन्याला साडे सात वाजता सुरुवात होते. तर 7 वाजता टॉस होतो. त्यामुळे त्या त्या वेळेस क्रिकेट चाहत्यांकडून टॉस कोण जिंकला? कुणाची बॅटिंग/फिल्डिंग आहे? अशी एकमेकांकडे विचारणा केली जाते. तशीच विचारणा 13 मे रोजी 19 व्या मोसमातील (IPL 2026) 57 व्या सामन्यात करण्यात आली. मात्र सामना सुरु होण्याच्या वेळेपर्यंत टॉसही झाला नाही. त्याचं कारण म्हणजे पाऊस. पावसामुळे 19 व्या मोसमात आधीच 1 सामना रद्द करावा लागला आहे. त्यामुळे आता पाऊस दुसरा सामना वाया घालवणार की काय? अशी भीती क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
रायपूरमध्ये जोरदार पाऊस
रॉयल चॅलेंजर्सं बगंळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र पावसामुळे मैदानात अर्धा फुट पाणी साचलं. ग्राउंड स्टाफच्या अथक प्रयत्नानंतर अखेर खेळपट्टी कोरडी झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता पंच पाहणीनंतर काय माहिती देतात याकडे लक्ष होतं. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजून 15 मिनिटांनी पंच खेळपट्टीची पाहणी करुन पुढील निर्णय घेणार होते. मात्र त्याआधीच चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.
चाहत्यांना मोठा दिलासा
उभयसंघातील सामन्याला रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. तसेच इतका वेळ वाया गेल्यानंतर पूर्ण 20 षटकांचा सामना होणार आहे. रायपूरमधील हा 19 व्या मोसमातील शेवटचा सामना आहे. आरसीबीने या मोसमात आतापर्यंत 11 तर केकेआरने 10 सामने खेळले आहेत. केकेआरने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीचा हा सामना जिंकून प्लेऑफचा दावा जवळपास निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे.
केकेआरसाठी करो या मरो स्थिती
तर दुसऱ्या बाजूला केकेआरने उर्वरित सर्व सामने जिंकल्यानंतरही एकूण 17 गुण होतील. त्यामुळे केकेआरच्या प्लेऑफच्या आशा कायम आहेत. मात्र त्यासाठी केकेआरला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. केकेआरचा या मोसमातील पंजाब विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे रायपूरमध्ये पुन्हा हवामानात बदल झाला आणि सामना पावसाने वाया गेल्यास केकेआरच्या अडचणीत वाढ होईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र तसं काही होऊ नये, अशीच आशा चाहत्यांना असणार आहे. त्यामुळे आता सुधारित वेळेनुसार सामन्याला सुरुवात होते की पुन्हा विलंब होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.